monsoon update : या तारखा आजच नोट करा, महाराष्ट्रात कोसळणार धो-धो पाऊस, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज

राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे, मात्र अजूनही पुरेसा पाऊस न झाल्यानं चिंतेचं वातावरण आहे. परंतु आता लवकरच महराष्ट्रात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज समोर आला आहे.

monsoon update : या तारखा आजच नोट करा, महाराष्ट्रात कोसळणार धो-धो पाऊस, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज
पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 15, 2026 | 11:50 PM

महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होऊन आता जवळपास 10 दिवसांपेक्षा अधिक काळ झाला आहे. परंतु अजूनही राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊसच झालेला नाहीये. जून महिला अर्धा संपत आला तरी देखील पाऊस न झाल्यानं राज्यात चिंतेचं वातावरण आहे. त्यातच यंदा भारतीय हवामान विभाग (IMD) कडून मान्सूनवर अल निनोचं सावट असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यंदा मान्सूनवर अल निनोचा परिणाम होणार असून, सरासरी पेक्षा कमी पाऊस होईल असा अंदाज यापूर्वीच हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार महाराष्ट्रात येत्या 20 तारखेपासून पावसाला सुरुवात होऊ शकते, 20 तारखेनंतर मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा देखील नवा अंदाज समोर आला आहे. पंजाबराव डख यांनी देखील जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.

नेमका काय आहे डख यांचा अंदाज? 

पंजाबराव डख यांनी मान्सूनबाबत सविस्तर अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाकडून यंदा पावसावर अल निनोचं सावट असणार आहे, असं सांगण्यात आलं आहे. परंतु अल् निनोचा पावसावर फार काही परिणाम होणार नाही असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. 20 जून नंतर राज्यात चांगल्या पावसाला सुरुवात होईल, पेरणी योग्य पाऊस होईल असं पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे. वीस तारखेनंतर पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होईल, त्यानंतर हा पाऊस मराठवाड्यात प्रवेश करेल आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्रात पाऊस होईल असा अंदाज डख यांनी वर्तवला आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि त्यानतंर जुलै महिन्यात देखील राज्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज देखील पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

पावसात वाऱ्यामुळे खंड पडत असतो, परंतु हे वारे जूनमध्ये नाही तर जुलैमध्ये सुरू होतात, परंतु यावर्षी जूनमध्येच वारं सुटल्यामुळे पावसाने ओढ दिली आहे. परंतु काळजी करण्याचं काही कारण नाही, जुलैमध्ये पाऊस चांगला राहील, ऑगस्ट महिन्यात पाऊस थोडा कमी होण्याची शक्यता आहे, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस चांगला होईल, त्यामुळे दुष्काळाची कोणतीही भीती नसल्याचं पंजाबराव डख यांनी म्हटलं आहे.

Follow Us