Weather Forecast: मान्सूनचा मुक्काम लांबला, IMD चा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात पावसाची जोरदार बरसात सुरुच
भारतीय हवामान विभागानं यंदा देशात मान्सूनचा पाऊस सर्वसाधारण राहिल असा अंदाज वर्तवला होता. 2021 चा मान्सून देशात लांबणार असल्याचा अंदाज आयएमडीनं वर्तवला असल्याची माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के. एस.होसाळीकर यांनी दिली आहे.
मुंबई: भारतीय हवामान विभागानं यंदा देशात मान्सूनचा पाऊस सर्वसाधारण राहिल असा अंदाज वर्तवला होता. 2021 चा मान्सून देशात लांबणार असल्याचा अंदाज आयएमडीनं वर्तवला असल्याची माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के. एस.होसाळीकर यांनी दिली आहे. राजस्थानातून यंदा पाऊस उशिरा निघणार आहे. जवळपास 7 ते 8 ऑक्टोबर नंतर मान्सूनच्या एक्झिटला सुरुवात होईल, अशी शक्यता आहे. राज्यात ठिकठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असल्यानं शेतकऱ्यांपुढं खरिपाची पीकं कशी काढायची असा प्रश्न उभा राहिला आहे.
Monsoon staying bit longer this year… ?☔☔?????☔?⛅??? pic.twitter.com/CckNuit1hh
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 24, 2021
वाशिम यवतमाळमध्ये जोरदार पाऊस
वाशिम जिल्ह्यात रात्रभर जोरदार पाऊस झाल्यातनंतर सकाळ दरम्यान रिमझिम पाऊस सुरुच आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन, हळद,कापूस,मूग,उडीद ,पिके धोक्यात यामुळे शेतकऱ्यामध्ये चिंता वाढली आहे.यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील इसापूर धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्याने, इसापूर धरणाचे 11 दरवाजे 50 सेमी ने उघडले आहेत. 532 क्युमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उमरखेड , हदगाव कळमनुरी, भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उस्मानाबादमध्ये मुसळधार पाऊस
उस्मानाबाद जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी झाले असून सोयाबीन उडीद यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणीच पाणी झाल्याने 2 ते 3 फूट पाणी साचले असून पूर्ण सोयाबीन पाण्यात गेले आहे, एकीकडे सोयाबीनचे भाव गडगडल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला असतानाच पाऊस पडल्याने सोयाबीन पाण्यात गेले आहे, शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी आद्यप एकही लोकप्रतिनिधी त्यांच्या सांत्वन मदतीला आला नाही तर नुकसानीचे ऑनलाईन पंचनामे जाचक ठरत असल्याने सरसकट मदत करावी अशी मागणी तेर येथील शेतकरी करीत आहेत
बीडमध्ये मांजरा धरण ओव्हरफ्लो
काल आणि मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने केज तालुक्यातील मांजरा धरणात पाण्याची आवक अतिप्रचंड वेगाने सुरू आहे. परिणामी मांजरा धरणाचे सहा दरवाजे तब्बल अडीच मीटरने उघडण्यात आले असून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. पाण्याची आवक पाहता लवकरच धरणाचे सर्वच्या सर्व 18 दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता आहे. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने माजलगाव तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. माजलगाव तालुक्यातील उमरी गावाशेजारून जाणाऱ्या सरस्वती नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी गावात शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय उमरी आणि देवळा गावाचा संपर्क देखील तुटला आहे.
नांदेडमध्ये पिकांना धोका
संततधार पावसाने किनवट- माहूर तालुक्यातील पांढरे सोने काळवंडलय. कपाशीच्या बोंडाला पावसाचा मार बसल्याने कापूस जाग्यावरच काळा पडलाय, तर काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाच्या शेंगांना जाग्यावर मोड फुटत चालले आहेत. त्यामुळे किनवट तथा माहूर या दोन्ही तालुक्यातील शेतकरी धास्तावलाय. त्यातच ढगाळ वातावरण आणि अधूनमधून येणाऱ्या पावसाने हे संकट वाढतच चाललंय.
बारामतीमध्ये पिकांना जीवदान
बारामती तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मोठा पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यातील पहिलाच मोठा पाऊस झाला. उसासह अन्य पिकांना जीवदान मिळालं आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत.
इतर बातम्या:
Vidarbha Rain : भंडाऱ्यातील मोहाडी शहरात पाणी साचलं, चंद्रपुरात मुसळधार पावसानं दाणादाण
Weather Forecast : कोकण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो ॲलर्ट जारी
Weather Forecast IMD predicted Monsoon will take late exit form India this year