Weather Update : महाराष्ट्रात पाऊस धो-धो कोसळणार, या तारखा आजच नोट करून ठेवा, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज
महाराष्ट्रात पावसाने दडी मारली आहे, संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यात पाऊसच पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परंतु आता राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख ( Weather expert Panjabrao Dakh) यांनी वर्तवला आहे.

राज्यात पावसाने मोठी दडी मारली आहे, ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेला आहे. राज्यात पाऊस पडला नसल्यामुळे खरीप हंगामावर मोठं संकट ओढावलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. मात्र आता पावसाची प्रतिक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. गणपती बाप्पाच्या आगमनासोबतच पावसाचं देखील आगमन होणार आहे. 13 सप्टेंबरपासून ते 18 सप्टेंबरपर्यंत राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे. याबाबत आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा नवा अंदाज समोर आला आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
काय आहे नवा अंदाज?
राज्यात गेल्या महिनाभरापासून चांगला पाऊस झालेला नाहीये, मात्र आता आनंदाची बातमी आहे, सप्टेंबर महिन्यात राज्यात चांगला पाऊस होणार आहे. 13 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या पाच दिवसांच्या काळात राज्यात दमदार पाऊस होणार आहे, शेतातून पाणी बाहेर पडणार आहे. गणेशोत्सव काळात राज्यात चांगला पाऊस पडले. तसेच त्यापूर्वी देखील राज्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान दुसरीकडे सात सप्टेंबर म्हणजे सोमवारी देशातील तब्बल 22 राज्यांना भारतीय हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहान करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-कश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, गुजरात, महाराष्ट्र, आसाम, त्रिपुरा आणि मेघालय या 22 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या काळात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारं वाहण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमार बांधवांनी या काळात मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.