Weather update : आयएमडीकडून अतिवृष्टीचा इशारा, पुढील बारा तास धोक्याचे, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
वातावरणात अचानक मोठा बदल झाल्यचं पहायला मिळत आहे. पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. आयएमडीकडून तब्बल 16 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, महाराष्ट्रासंदर्भात देखील मोठा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल झाल्याचं पहायला मिळत आहे. पुढील 12 तासांमध्ये देशातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. अनेक राज्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पर्वतीय प्रदेशात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे, या भागांमध्ये भूस्खलनाच्या घटना देखील घडू शकतात, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, या काळात मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे. हवामान विभागाकडून तब्बल 16 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा
पुढील 12 तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाकडून अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच या काळात जोरदार वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, जम्मू-कश्मीर, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, गुजरात, महाराष्ट्र आणि केरळ अशा 16 राज्यामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो, असा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी शेतात काम करताना काळजी घ्यावी, असा इशारा देखील भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
महाराष्ट्राला मोठा इशारा
राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून, राज्यातील अनेक भागात पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ, आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता असून, नागपूर, गोंदिया, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नाशिक, जळगाव सह इतर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. राज्यात मागील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर ओसरला होता, परंतु आता पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
