खाकीच्या आड दडलेली माणुसकी आली समोर, संकटात सापडलेल्या बळीराजासाठी ‘धाराशिव पॅटर्न’, पोलिसांचा उपक्रम काय ?
खाकी वर्दीचा वापर केवळ कायद्याचा धाक दाखवण्यासाठी नाही तर माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी, माणसांना मदतीचा हात देण्यासाठीही होऊ शकतो, हा आदर्श धाराशिवने घालून दिलाय.
संतोष जाधव, धाराशिव | खाकी वर्दी अंगावर चढवली की कायद्याचा धाक दाखवणं, चुकीची कामं करणाऱ्या लोकांना सरळ करणं एवढंच पोलिसांचं काम असा सर्वसामान्य समज आहे. खाकी वर्दीतली माणसं पाहून त्यांच्याबद्दल एक भीतीदेखील सामान्यांच्या मनात असते. मात्र धाराशिवची बातच काही और आहे. गेल्या काही दिवसात या खाकी वर्दीतल्या माणसांनी इथलं चित्रच पालटलंय. विशेष म्हणजे अस्मानी आणि सुलतानी संकटानी पीडलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी दिलेला मदतीचा हात जास्त चर्चेत आहे. धाराशिवमधील सेंद्रीय शेती उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी थेट पोलीस ठाण्यातच आठवडी बाजार भरवला जातो. बळीराजाला स्वाभिमानानं, आत्मविश्वासानं उभं करण्यासाठी हा मदतीचा हात आता चर्चेचा विषय ठरतोय.
धाराशिवचा खास पॅटर्न काय?
सेंद्रीय शेती उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात सेंद्रीय शेतीमालाची विक्री करण्याच्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. दर आठवड्याला हा सेंद्रीय शेतीमालाचा बाजार भरविण्यात येणार असून पोलीस कर्मचार्यांनी सेंद्रीय उत्पादने खरेदी करावीत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले.
धाराशिवचा स्वतंत्र ब्रँड
सेंद्रीय शेतीमालाचे उत्पादन करणार्या शेतकर्यांची बैठक नुकतीच घेण्यात आली होती. या बैठकीत सेंद्रीय शेतीमालाची विक्री करण्यासाठी ऑरगॅनिक मॉल व धाराशिव जिल्ह्याचा स्वतंत्र ब्रॅन्ड तयार करण्याबाबत चर्चा झाली होती. त्याअनुषंगाने जिल्हा पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात आठवड्यातून एक दिवस सेंद्रीय भाजीपाला व इतर उत्पादनाचा बाजार भरविण्यात येत आहे. या भाजीपाल्यासाठी विशिष्ट दर ठरविण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमर मगर, धीरज पाटील, गोकुळ शिंदे, आबासाहेब कापसे, राजकुमार रोचकरी, आनंद कंदले, उपविभागीय पोलीस अधिकारी गीतांजली दुधाणे, पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद उपस्थित होते.
अॅपद्वारे होणार सेंद्रीय शेतीमालाची विक्री
बदलते हवामान, शेतीमालाला मिळणारा कमी भाव व इतर कारणामुळे शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत आहेत तसेच आर्थिक किंवा शेतीच्या बांधाच्या करणावरुन शेतकरी – शेतकर्यांमध्ये वाद होऊन गुन्ह्याच्या घटना देखील घडतात. अशा घटना रोखण्यासाठी सेंद्रीय शेतीमालाची बाजारपेठ निर्माण करण्यात येत असून या मालाकरिता सेंद्रीय उत्पादनाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर शेतीमालाच्या विक्रीसाठी एक अॅप देखील विकसित करण्यात येत असून या अॅपद्वारे शेतीमाल उत्पादक ते थेट ग्राहक अशी विक्री करता येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.