ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या नाही…सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर जेष्ठ वकील उज्ज्वल निकम असं का म्हणाले ?

सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधात ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये स्थगितीची मागणी करण्यात आली होती. त्यावर नुकतीच सुनावणी पार पडली आहे.

ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या नाही...सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर जेष्ठ वकील उज्ज्वल निकम असं का म्हणाले ?
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Feb 22, 2023 | 4:43 PM

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालात एकनाथ शिंदे ( Eknath Shinde )  यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय झाला होता. त्यावर आक्षेप घेत ठाकरे ( Uddhav Thackeray ) गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर नुकतीच सुनावणी पार पडली आहे. त्यामध्ये ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यात यावी यासाठी याचिका दखल केली होती. त्यावर सुनावणी पार पडली असून पुढील सुनावणी एक आठवड्यानंतर होणार असल्याचे सांगत दोन आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्या वकिलासह निवडणूक आयोगाला उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहे.

सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचे बोलले जात असतांना जेष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उज्ज्वल निकम यांनी ठाकरे गटाला हा धक्का म्हणता येणार नाही असे म्हंटलं आहे.

याशिवाय ठाकरे गटाने केलेली मागणी बघता इतकी महत्वाची हा मुद्दा आहे का ? त्याने काय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट यावर स्थगिती देईल अशी शक्यता नव्हतीच असेही उज्ज्वल निकम म्हणाले आहे.

नैसर्गिक न्यायदान तत्वानुसार दोन्ही बाजूचे ऐकून घ्यावं लागतं. त्यामुळे आठ दिवसांनी ही सुनावणी ठेवली आहे. निवडणूक आयोग आणि शिंदे यांना उत्तर सादर करावे लागणार आहे. आणि त्यानंतर दोन्ही बाजूचे ऐकून घेऊन न्यायालय निर्णय घेऊ शकेल असंही उज्ज्वल निकम यांनी म्हंटले आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर ठाकरे गटाच्या वकिलांनी जो आक्षेप घेतला आहे. त्यावर उत्तर आल्यावर ठाकरे यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते हे महत्वाचे असेल तरच ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या की नाही हे स्पष्ट होईल असेही उज्ज्वल निकम यांनी म्हंटले आहे.

सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्या वकिलाने आम्ही व्हीप काढणार नाही असं सांगितल्याने स्थगितीचा निर्णय झाला नाही. पण उत्तर सादर करेपर्यन्त एक दिलासा असल्याचे जेष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले आहे.

एकूणच उद्धव ठाकरे यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्ट यावेळी ठाकरे गटाची याचिका ऐकणार आहे. त्यामुळे स्थगिती मिळाली नसली तरी आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार नाहीये ही देखील ठाकरे गटासाठी महत्वाची बाब आहे. त्यामुळे पुढील आठवड्यातील सुनावणीत काय होणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Follow Us