पवारांचे खासदार मोदींना भेटून काय दिवे लावणार, अंबादास दानवे यांची टीका
खरंतर बारामतीलाच विमान दुर्घटना का घडते, हे बघितलं पाहिजे कारण, पुढच्याला ठेच, मागचा शहाणा होतो. एक अपघात होऊन जर या गोष्टी सुधारत नसतील तर कायमचाच तो एअरपोर्ट बंद केला पाहिजे अशी मागणी शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

शरद पवार यांचे खासदार पंतप्रधान मोदी यांना उद्या भेटणार आहेत. याआधी एकनाथ शिंदे यांचे फुटीर खासदार पंतप्रधान मोदींना भेटले होते. या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. पवारांचे खासदार मोदींना भेटून काय दिवे लावणार आहेत. आता जर देशाची परिस्थिती बघितली तर कोणता घटक सुखी आहे.मोदींची भेट घेतल्यानंतर त्यात काय बदल होणार आहे असा सवालही दानवे यांनी केला आहे.
भाजपाला राजकीय भीती वाटत आहे. डीलिमिटेशन बिलाविषयी त्यांचा एवढा अट्टाहास का आहे हेच कळत नाही.महिला आरक्षणाचे बिल 2023 पासून मंजूर झालं आहे, पण ते अजून लागू झालेले नाही आणि हे लोकांची दीशाभूल करत आहेत की विरोधक महिलांना विरोध करत आहेत.तुमचा मुख्य हेतू डीलिमिटेशन आहे. महिला आरक्षण नाही. काही भागातील खासदार वाढावे आणि काही भागातील कमी व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टी असा प्रयत्न करत असेल असेही दानवे यांनी टीका करताना म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दिल्लीत सिंदूर रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की आपल्या देशातल्या भगिनींचे सिंदूर गोळ्या मारून हिसकावून नेलं, त्याच्यासाठी हे सिंदूर ठेवतात का ? एकनाथ शिंदे यांचा दिल्लीशी काय संबंध आहे ? अमित शहा आणि मोदींचे पाय चेपणं एवढाच संबंध उरला आहे. बाकी काय संबंध शिंदेंचा दिल्लीशी असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.
जरांगे पाटील यांनी मी जीव देऊ शकतो आणि जीव घेऊही शकतो असे वक्तव्य केले आहे. त्याबद्दल विचारता अंबादास दानवे म्हणाले की मला वाटतं जीव देण्याची आवश्यकता नाही, समाजाच्या प्रश्नासाठी चांगल्या पद्धतीने जगण्याची आवश्यकता आहे. मनोज जरांगे पाटील सातत्याने मराठा समाजाच्या प्रश्नासाठी लढा देत आहेत असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी एकत्र विमान प्रवास केला आहे. त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा पूर्ण नियोजित कार्यक्रम होता. त्यामुळे त्यांनी एकत्रित प्रवास केला असेल. त्यात फार वावगं वाटत नाही. प्रवासाची साधनं कमी आहेत म्हणून एकत्रित गेले असतील असे त्यांनी म्हटले आहे.
