Dhananjay Munde : ‘घटना घडली की पावती माझ्याच नावावर’, बऱ्याच दिवसांपासून मनात साचलेलं सगळं धनंजय मुंडेंनी बोलून दाखवलं
Dhananjay Munde : बीड जिल्ह्याच्या राजकारणातील चर्चेत असलेले नेते म्हणजे धनंजय मुंडे. नुकतीच धनंजय मुंडे यांनी एका भाषणात आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली. जे मनात साचलेलं ते बोलून दाखवलं. यात मनातलं दु:ख, खेद, वेदना हे सर्व होतं.

आमदार धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठं प्रस्थ आहे. पण संतोष देशमुख हत्याकांडानंतर धनंजय मुंडे यांच्या राजकीय अडचणी वाढल्या. त्यांच्यावर बरेच आरोप झाले. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीमामा द्यावा लागला. तेव्हापासून राजकारणात धनंजय मुंडे यांची पिछेहाट सुरु आहे. धनंजय मुंडे पुन्हा मंत्री कधी होणार? याची राजकीय वर्तुळात अनेकदा चर्चा होते. पण सध्या तशी काही चिन्ह दिसत नाहीयत. बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघात आमदार धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसाच्यावेळी लावलेल्या शुभेच्छा बॅनर्सची बरीच चर्चा झाली.’भावी कॅबिनेट मंत्री’ असा काही कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनर्सवर उल्लेख होता. मराठी आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे नेहमीच धनंजय मुंडे यांना टार्गेट करत असतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. जे मनात साचलेलं ते बोलून दाखवलं.
मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेल्या आमदार धनंजय मुंडे यांनी परळीत झालेल्या एका कार्यक्रमात आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. “केवळ एका व्यक्तीला बदनाम करुन एका गावाची प्रगती थांबू शकत नाही, मी काल माझ्या जीवनात एवढा कधीच अस्वस्थ झालो नव्हतो, तेवढा अस्वस्थ झालोय” असं धनंजय मुंडे म्हणाले.
हे संघर्षाचे जीवन मी जगलंय
“बीड जिल्ह्यात कोणतीही घटना घडली, कुठलाही खडा पडला, की पावती माझ्या नावावर आहे, माझ्या विरोधात भाषण आहे. झालंय कुठं, कोणाचं झालंय, घेणं नाही देणं नाही, वाजवा रे वाजवा… हे संघर्षाचे जीवन मी जगलंय” असं धनंजय मुंडे म्हणाले. “असंख्य आरोप घेईल, असंख्य आरोप करंल, मला आज कोणावर बोलायचे नाही… परळीत सिमेंट फॅक्टरी कशी आली, माझ्याकडे असलेले टेंडर मी त्या कंपनीला दिले, दुसऱ्या एका कंपनीला जागाही दिली तेव्हा विकास झाला” असं आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. आमदार धनंजय मुंडे यांचं हे भाषण आता चर्चेचा विषय ठरलं आहे.
