फुटीर खासदारांचं फिरणं मुश्किल होणार? उद्धव ठाकरेंनी भरसभेतून थेट दिले आदेश, म्हणाले, आता तुम्हीच…
उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की चारशे वर्षे झाले तरी इतिहासात खंडूजी खोपडेच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला गेला नाही. यांचा शिक्का जायला किती वर्षे लागतील असाही सवाल उद्धव यांनी यावेळी केला.

उद्धव ठाकरे यांची तोफ आज षण्मुखानंद हॉलमध्ये धडाडली. शिवसेना पक्षाची दुसऱ्यांदा फूट झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी साल २०२२ मध्ये पाडलेल्या पहिल्या फूटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आलेल्या ९ खासदारांपैकी ६ खासदार एकनाथ शिंदे यांनी गळाला लावले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन आज साजरा झाला,त्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की उद्या समजा शिवसेना निवडणुकाच लढणार नाही. मग काय करतील ते ? तुम्ही राहणार का माझ्यासोबत. मरमर मेहनत तुम्ही करायची. यांचे खोक्यावर खोके. शेतकऱ्यांना हमीभाव नाही. पण खासदारांचे हमी भाव ठरले. त्यांनी कर्जमाफी दिली. ती देखील फसवी आहे. शेतकरी म्हणत असतील मेलो तरी चालेल. पण यांची अशी कर्जमाफी नको. निवडणुकी आधी लाडकी बहीण. आता ८० लाख बहिणींचे पैसे काढून घेतले. दाढी खाजवत होते. तर्रेबाज फिरत होते पैशे मिळाले का असे लाडक्या बहिणींना विचारत होते.
या खासदारांना निवडून आणण्यासाठी अरे मेहनत तुम्ही केली ना. मत तुम्ही दिलं ना. मग जाब विचारण्याचा अधिकार तुम्ही का सोडताय ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांना केला. ते पुढे म्हणाले की तुम्ही का जाब विचारत नाही. हिंमत होतेच कशी ? आदेश काय देऊ. निवडून तुम्ही दिलं. मेहनत तुम्ही घेतली. जाब विचारण्याचा अधिकार तुमचा आहे. विचारा जाब त्यांना ? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.
कपाळावरचा गद्दारीचा शिक्का
उद्धव ठाकरे म्हणाले की माझं भाषण एकदा झालं. तेव्हा शेतकरी आला. बटवा घेऊन आला. म्हणाले. तुमच्या हस्ते ही मदत उमेदवाराला द्यायची आहे. किती पैसे असतील. मी नाही पाहिले. छोटा बटवा होता. त्या प्रेमाने दिलेल्या पैशाने आपण निवडणूक जिंकलो. समोरून पैशाचा महापूर होता. शिवसेनेला हरवायचं होतं. आपल्यासमोर हरामाचा पैसा ओतला जात होता. तेव्हा हा शेतकरी आपल्याला पैसा देत होता. त्यांनी जिंकून आणलं. चारशे वर्षे झाले तरी खंडूजी खोपडेच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसला गेला नाही. यांचा जायला किती वर्ष लागतील. तुम्ही महाराष्ट्राचा विश्वासघात करताय असे उद्धव यावेळी म्हणाले.
