कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे भावनिक आवाहन; ‘त्या’ मुलींच्या शिक्षणाची स्वीकारली जबाबदारी

शासनाकडून मिळणारी मदत तातडीने मिळेल, याची व्यवस्था केली आहे; पण त्यांना चार मुली आहेत.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे भावनिक आवाहन; त्या मुलींच्या शिक्षणाची स्वीकारली जबाबदारी
dhananjay munde
| Edited By: | Updated on: Aug 19, 2023 | 4:17 PM

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना शुक्रवारी एका भावनिक क्षणाला सामोरे जावे लागले. मनोज राठोड आणि नामदेव वाघमारे या दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका शेतकऱ्याच्या पोटी चार मुली आहेत. या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मनोज राठोड आणि नामदेव वाघमारे या दोन शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांचे कुटुंबीय धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी यवतमाळमध्ये आले होते. धनंजय मुंडे यांच्याकडे आपली व्यथा मांडत असताना त्या महिला भगिनीला रडू कोसळले.

शेतकरी नवरा तर गेला आता चार मुलींचा सांभाळ कसा करणार, असा प्रश्न विचारत ती भगिनी धाय मोकलून रडू लागली. त्यात शासनाची मिळणारी मदतही अद्याप मिळाली नसल्याचे तिने धनंजय मुंडे यांना सांगितले.

चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

धनंजय मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांना फोन केला. या दोनही कुटुंबांना तात्काळ अर्थसहाय्यची मदत देण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर एकाच कुटुंबातील चार मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

राज्याचे कृषीमंत्री म्हणून काम करत असताना धनंजय मुंडे यांच्या समोर असा प्रसंग पहिल्यांदाच आला असावा. मागच्या काळात अशा अनेक प्रसंगांना त्यांनी अत्यंत संवेदनशील पद्धतीने हाताळलेले आहे.

शेतकऱ्यांना मदत करणार

आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत. कुटुंबापुढील प्रश्न आणखी वाढतात. आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा विचार करून कुठल्याही शेतकरी बांधवाने आत्महत्या करण्याचा विचार मनात आणू नये. कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा शेतकरी बांधवांना कोणतीही मदत लागल्यास आपल्या घराचे दरवाजे 24 तास उघडे आहेत. असे भावनिक आवाहन या प्रसंगाच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरून केले आहे.

धनंजय मुंडे यांची पोस्ट काय?

धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबूक पोस्टवर लिहिले की, काल मी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. आत्महत्याग्रस्त शेतकरी मनोज राठोड यांच्या कुटुंबातील एक महिला भगिनी मला भेटायला आल्या. त्यांना शासनाकडून मिळणारी मदत तातडीने मिळेल, याची व्यवस्था केली आहे; पण त्यांना चार मुली आहेत. त्या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी मी घेतली आहे.

सांगायचा उद्देश हा आहे की, आत्महत्या केल्याने फक्त जीवन संपते. प्रश्न सुटत नाहीत. उलट ते वाढतात! माझ्या शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती आहे की असा विचार मनातसुद्धा आणू नका. तुमच्या कोणत्याही अडचणीत मदतीसाठी माझी दारं 24 तास उघडी आहेत.