अख्खं गाव सुतकात, तरुण जिद्दीला पेटले, लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिच्चून कोव्हिड सेंटर उभारलं!

| Updated on: May 14, 2021 | 12:37 PM

कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी कुठे आहेत, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण करवीर तालुक्यातील गिरगाव गावात, (Girgaon corona) तरुणांनी मिळून कोव्हिड सेंटर (Covid center) उभं केलं आहे.

अख्खं गाव सुतकात, तरुण जिद्दीला पेटले, लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिच्चून कोव्हिड सेंटर उभारलं!
Kolhapur Girgaon Covid center
Follow us on

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने हैदोस घातला आहे. धक्कादायक म्हणजे कोल्हापुरातला मृत्यूदर (Kolhapur corona cases) देशात सर्वाधिक आहे. हातकणंगले, भुदरगड, करवीर हे जिल्हे मृत्यूदरांमध्ये आघाडीवर (Kolhapur corona death rate) आहेत. जो देशभर प्रश्न आहे, तोच कोल्हापुरातही आहे. हॉस्पिटल भरले आहेत, रुग्णांना बेड, ऑक्सिजन मिळत नाही, मुंबई-पुण्याप्रमाणे प्रशस्त कोव्हिड सेंटर्स नाहीत. जी आहेत ती कोव्हिड सेंटर्स फुल्ल आहेत.

अशा परिस्थितीत कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी कुठे आहेत, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण करवीर तालुक्यातील गिरगाव गावात, (Girgaon corona) तरुणांनी मिळून कोव्हिड सेंटर (Covid center) उभं केलं आहे. लोकप्रतिनिधींच्या भरोशावर न बसता, गावातील तरुणांनी एकत्र येऊन आजूबाजूच्या गावकऱ्यांसाठी हे कोव्हिड सेंटर उभं केलं आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष रुपेश पाटील यांनी पुढाकार घेऊन, गावातील तरुणांच्या साथीने आश्रमशाळेत कोव्हिड सेंटर उभारलं.  (Youths from Girgaon Kolhapur set up covid center without help of politicians)

निलेश लंके करु शकतात, मग कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी का नाही?

एकीकडे आमदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्ह्यात स्वत: 1100 खाटांचे कोव्हिड सेंटर उभारलं आहे. त्यांच्या या कामाचं राज्यभर कौतुक होत आहे. जर एकटा आमदार 1100 खाटांचं कोव्हिड सेंटर उभं करु शकतो, तर कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींना का जमत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे दोन खासदार आहेत. शिवाय पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यासारख्या बड्या नेत्यांसह जिल्ह्यात दहा आमदार आहेत.

प्रत्येक जण आपआपल्या परीने काम करत असेलही, पण आता गिरगावसारख्या गावात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाला हद्दपार करण्यासाठी यंत्रणा उभी करण्याची खरी गरज आहे. हे नेते पुढाकार घेऊन आपल्या जिल्ह्यातील कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आवश्यक पावलं उचलीत अशी आशा आहे. जर प्रत्येक नेत्याने, आमदाराने आपआपल्या भागात जशी मतदानावेळी यंत्रणा उभी करतो, तशी यंत्रणा उभी केली तर लोकांना किमान धीर तरी मिळेल.

आख्खं गाव सुतकात

सैनिकांचं गाव अशी ओळख असलेलं गिरगाव सध्या सुतकात आहे. जवळपास 6 हजार लोकसंख्या असलेल्या या गावात सध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कारगिलच्या लढाईत पराक्रम गाजवणाऱ्या माजी सैनिकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. याशिवाय मागच्या आठवड्यात कोरोनाने मृत्यू झालेल्या एका रुग्णाच्या तरुण मुलाचा दोन दिवसापूर्वी कोरोनाने निधन झालं. त्याशिवाय एक आजी आणि तिचा विशीतील नातूही कोरोनाने हिरावले. आख्खी घरंच्या घरं उद्ध्वस्त होत असल्यामुळे गावात कोरोनाची दहशत पसरली आहे. आख्खं गाव सुतकात असल्याचं चित्र आहे.

ऑक्सिजनअभावी माजी सैनिकाचा मृत्यू

करवीर तालुक्यातील गिरगाव येथील 41 वर्षीय सर्जेराव पांडुरंग कुरणे या माजी सैनिकाचं ऑक्सिजनअभावी 1 मे रोजी निधन झालं. हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपल्याने कुरणे यांना प्राण गमवावे लागल्याचे समोर आले आहे. सर्जेराव कुरणे यांनी कारगिल युद्धात सुरुवातीपासून ते विजयापर्यंत लढले होते. दहशतवाद्यांवर ग्रेनेड फेकताना हातात ग्रेनेडचा स्फोट होऊन त्यांनी हाताची तीन बोटे आणि एक डोळा गमावली होती.

बाप-लेकाचा मृत्यू

दरम्यान, मागील आठवड्यात दगडू जाधव या साठीतील व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचा 33-34 वर्षांचा विवाहित मुलाचं दोन दिवसापूर्वी कोरोनानेच निधन झालं. त्यामुळे जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

आजी-नातवाला कोरोनाने हिरावलं

याच गावातील आजी आणि तिचा विशीतील नातू कोरोने हिरावला. आजीचं दोन दिवसापूर्वी तर नातवाचं काल कोरोनाने निधन झालं. याशिवाय आता गिरगावातील परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. घराघरात कोरोनाने एण्ट्री घेतली आहे. त्यामुळे आख्खं गाव दहशतीत आहे.

रुग्णालये फुल्ल, तरुणांनी कोव्हिड सेंटर उभारलं

दरम्यान, गिरगावात कोरोनाने धुमाकूळ घातल्यामुळे भीतीचं वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णालये फुल्ल आहेत. बेड-ऑक्सिजनची वाणवा आहे. खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाऐवजी बिलं पाहून लोकांचा जीव मेटाकुटीला येत आहे. अशा परिस्थितीत सैनिक गिरगावातील तरुणांनी मिळून कोव्हिड सेंटर उभारण्याचा निर्धार केला. एक-एक मिळत तरुणांची फौज जमली आणि लोकप्रतिनिधींच्या मदतीची वाट न पाहता 100 खाटांचं कोव्हिड सेंटर उभं केलं.

Girgaon kolhapur covid center

खासदार संभाजीराजे छत्रपती, पोलीस अधीक्षक शैलेंद्र बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गिरगावचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य, पोलिस पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आज (ता. 14) सायंकाळी 5 वाजता कोविड सेंटरचे लोकार्पण होत आहे.

तुमच्या मदतीची अपेक्षा

दरम्यान, गिरगावात उभारलेल्या या कोव्हिड सेंटरला आता तुमच्या मदतीची अपेक्षा आहे. गावातील नागरिकांनीच रुग्णांच्या जेवणासाठी तेल, मीठापासून, तांदूळ, चटणीपर्यंत मदतीसाठी हात पुढे केले आहेत. एक मास्कपासून ते सॅनिटायजरपर्यंत जी मदत द्याल ती आवश्यक आहे.

गावातील डॉक्टर्स या कोव्हिड सेंटरमध्ये आपली सेवा देणार आहेत. त्यांच्या दिमतीला आशा वर्कर्स, वैद्यकीय कर्मचारी असतील. याशिवाय या तरुणांनी शहरातील रुग्णालयांशी संपर्क साधून तिथल्या डॉक्टरांना आवश्यक ती मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

 सर्वाधिक मृत्यूदर कोल्हापुरात

1.09 टक्के हा देशाचा मृत्यूदर आहे. 1.49 टक्के हा आहे महाराष्ट्रातला मृत्यूदर. आणि 3.5 टक्के हा आहे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातला मृत्यूदर आहे.

दुसरी लाट सुरु होऊनही कोल्हापुरातलं चित्र अनेक दिवस दिलासादायक होतं. मात्र सध्या कोल्हापूर जिल्ह्यातला मृत्यूदर चिंतेचा विषय बनलाय. या घडीला कोल्हापूर जिल्ह्यातला मृत्यूदर हा महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात सर्वाधिक आहे. मात्र या टक्केवारीत फक्त प्रशासनच नाही, तर लोकांची दिंरगाई सुद्धा कारणीभूत ठरतेय.

संबंधित बातम्या   

हातात फुटलेल्या बॉम्बमधून बचावला, कोल्हापुरात माजी सैनिकाचा ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू

Special Report | राज्यात कुठे किती लसीकरण? कोणता जिल्हा सर्वात पुढे?

निलेश लंके फाऊंडेशनसाठी कार्यकर्त्याचा चेक, लंकेंना फोन करुन अजित पवार म्हणतात…

(Youths from Girgaon Kolhapur set up covid center without help of politicians)