
रयत क्रांती शेतकरी संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी वाळवा तालुक्यातील मरळनाथपूर या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान केलं. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेने पंचायत समितीसाठी मोठ्या संख्येने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील बिडकीन मतदान केंद्रावर पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. विनाकाम महिला गर्दी करत असल्याने पोलिसांनी महिलांना बाहेर काढले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील नानेगाव मतदान केंद्रावर आज मतदानादरम्यान मोठा राडा झाला. भाजपचे अंभई गटाचे उमेदवार त्रिंबक पाटील गव्हाणे यांना अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्रिंबक पाटील गव्हाणे हे मतदान केंद्राची पाहणी करत असताना हा प्रकार घडल्याचे समजते. या घटनेनंतर नानेगाव परिसरात तणावाचे वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आले आहे.
परभणी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज अत्यंत चुरशीच्या वातावरणात मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर प्रचाराचा धुरळा पाहायला मिळाला. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ४९ जागांवर उमेदवार उतरवून आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ४२ उमेदवारांसह त्यांना जोरदार टक्कर देत आहे. शिवसेना (उबाठा) २३, काँग्रेस २१ आणि वंचित बहुजन आघाडी २४ जागांवर नशीब आजमावत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांचा मोठा ओघ पाहायला मिळत असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये मतदानाच्या दिवशीच गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे. सिल्लोडमधील नायगाव येथील मतदान केंद्रावर भाजप उमेदवाराला धक्काबुक्की करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. धक्काबुक्कीच्या या प्रकारानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. निवडणुकीच्या शांततामय वातावरणात झालेल्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी परंडा तालुक्यातील मुगाव येथे आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी जिल्ह्यात शिवसेनेला मतदारांच्या पाठिंब्यावर मोठे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. विशेष म्हणजे, धाराशिवमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून भाजप आणि शिवसेना यांच्यात दावे-प्रतिदावे सुरू असताना सावंतांनी मोठे विधान केले आहे. “अध्यक्षपदाबाबत पक्षप्रमुख एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील आणि जो आदेश देतील, तो आम्हाला मान्य असेल,” असे सांगत त्यांनी चेंडू मुख्यमंत्र्यांच्या दरबारात टोलावला आहे. तरीही, अध्यक्षपदावर शिवसेनेचा दावा कायम असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.
सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. ईश्वपूरजवळील त्यांच्या मूळ गावी, म्हणजेच साखराळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. यावेळी विशेष म्हणजे कोणत्याही बडेजावाशिवाय जयंत पाटील हे सामान्य नागरिकांप्रमाणे मतदान केंद्रावर रांगेत उभे राहिले होते. मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आणि विशेषतः राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठे यश मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी मतदान केलं. यावेळी आई हिराबाई पडळकर आणि कार्यकर्त्यांसमवेत मतदान केंद्रावर जात पडळकर यांनी आपलं मतदान केलं. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेने पंचायत समिती साठी मोठ्या संख्येने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
अकलूजमध्ये मतदानादरम्यान एक खळबळजनक प्रकार समोर आला असून, यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अर्जुनसिंह मोहिते पाटील हे आपले पुत्र रुद्रराज मोहिते पाटील यांना सोबत घेऊन मतदान केंद्रावर पोहोचले. मात्र, मतदान केंद्राध्यक्षांनी नियमांचे बोट ठेवत लहान मुलाला केंद्रात नेण्यावर तीव्र आक्षेप घेतला. यावर आपली बाजू मांडताना अर्जुनसिंह मोहिते पाटील म्हणाले की, आपल्या आई-वडिलांना लोकशाहीचा हक्क बजावताना प्रत्यक्ष पाहता यावे, या उद्देशानेच त्यांनी मुलाला सोबत आणले होते. केंद्राध्यक्षांच्या या भूमिकेमुळे आणि मोहिते पाटलांच्या निर्वाळ्यामुळे केंद्रावर उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले होते.
रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज राज्यमंत्री योगेश कदम यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना गावाच्या विकासाचा भक्कम पाया संबोधले. विधानसभा आणि लोकसभेप्रमाणेच या निवडणुकांचे महत्त्व अनन्यसाधारण असून, लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. “प्रत्येक मत महत्त्वाचे आहे, त्यामुळे घराबाहेर पडून आवर्जून मतदानाला उतरा,” असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी रत्नागिरीकरांना केले.
छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना खासदार संदिपान भुमरे यांनी आज मतदानाचा हक्क बजावत विजयाचा मोठा दावा केला आहे. सकाळी सकाळी मतदारांचा मिळणारा मोठा प्रतिसाद पाहता मतदानाची टक्केवारी वाढेल. त्याचा थेट फायदा शिवसेनेला होऊन आमचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आम्ही ४१ जागा लढवत असून अनेक ठिकाणी युती कायम आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकणार, असेही ते म्हणाले. पाचोडच्या जागेवरील घराणेशाहीच्या आरोपांना उत्तर देताना संदीपान भुमरे यांनी स्पष्ट केले की, ही उमेदवारी कोणावरही लादलेली नसून लोकांमधून निवडून येणारे नेतृत्व आहे, जे निकालातून स्पष्ट होईल.
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज मतदानाचा जोर दिसून येत आहे. माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटील आणि यशवंत पंचायत समितीच्या यशवंतनगर गणाचे उमेदवार वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांनी आज सकाळी मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. मोहिते पाटील कुटुंबीयांच्या या मतदानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, उमेदवारांनी मतदारांना मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषदेच्या ६८ आणि पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी २७१, तर पंचायत समितीसाठी ४८५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. जिल्ह्यातील एकूण २४ लाख ५९ हजार २२७ मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, प्रशासकीय यंत्रणेने सर्व मतदान केंद्रांवर चोख तयारी केली आहे. ग्रामीण भागातील जनतेचा हा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागणार, हे आज मतपेटीत कैद होणार आहे.
रोहित पवार पिंपळी मतदान केंद्रावर दाखल झाले. त्यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे.
राज्यातील 12 ठिकाणी होत असलेल्या निवडुकीत मतदारांनी मतदान करण्याचे योगेश कदम यांचे आवाहन. जिल्हा परिषद पंचायत समिती ही ग्रामीण भागाचा पाया मजबूत करणारी निवडणूक
सुमारे 40 मिनिटांपासून ईव्हीएम मशीन बंद पडले होते. मतदार रांगेत ताटकळत उभारले. जवळपास 40 मिनिटांनी बंद पडलेले ईव्हीएम मशीन सुरू झाले.
राहु येथील मतदान केंद्रावरती आमदार राहुल कुल तसेच भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष कांचन कुल यांनी मतदान केले…
मतदानासाठी मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद. विकासाचे व्हिजन असलेला उमेदवार पाहून आम्ही मतदान करतोत सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे अशी प्रतिक्रिया मतदार व्यक्त करत आहेत…
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी खासदार संदिपान भुमरे करणार मतदान. पाचोड जिल्हा परिषद गटातून खासदार भुमरे यांचे पुतणे शिवराज भुमरे आहेत उमेदवार
मशीन सुरू न झाल्याने अद्याप मतदान केंद्रावर मतदान अद्याप सुरू नाही. मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शितलकुमार मोटे यांनी..
शिवसेना ठाकरे गटाच्या कोंडी पंचायत समिती गणाचे उमेदवार सोमनाथ राऊत यांच्याकडून पूजा करण्यात आली. सोलापूर मध्ये झेडपीचे 68 आणि पंचायत समितीचे 136 गणासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे
मशीन सुरू न झाल्याने अद्याप मतदान केंद्रावर मतदान अद्याप सुरू नाही. नागरिकांची मोठी रांग मतदानाला लागल्याचे बघायला मिळत आहे.
कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे सर्व मतदारांनी मतदान करावं आणि मी मतदारसंघाच्या विकासासाठी मी लढत आहे असे सक्षणा सलगर यांनी म्हटले आहे.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी. मतदानाला ग्रामीण भागात जाण्यासाठी प्रवासी निघाले. बस संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांची घरी जाण्यासाठी तारांबळ. स्वारगेट बस स्थानक हाउसफुल
आज राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे मतदान होत असून काही भागात सकाळीच EVM मशिन बंद पडल्याची माहिती मिळत आहे.
कराडमधील चचेगावमध्ये EVM बंद पडलं आहे. बूथ क्रमांक78 वरील मशीन बंद पडलं असून त्यामुळे मतदानाला उशीर होताना दिसत आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि ९ पंचायत समितींसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी 56 गटांसाठी 151 उमेदवार, तर 9 पंचायत समितीच्या 112 जागांसाठी 321 उमेदवार रिंगणात आहेत. 1693 मतदान केंद्रावर मतदान होणार असून , 4286 मतदान यंत्रं आहेत. जिल्ह्यात 11लाख 73 हजार 899 मतदार आहेत.
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्हा परिषदच्या 61 जागासाठी 211 जण रिंगणात आहेत. तर पंचायत समिती 122 जागासाठी 327 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 18 लाख 18 हजार 742 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदान प्रक्रियेसाठी 2 हजार 39 मतदान केंद्रे आणि 9 हजार कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत.
भरणेवाडी, इंदापूर येथे जिल्हा परिषद ,पंचायत समिती मतदानाला सुरुवात झाली. इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील मतदान केंद्रावरती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रावरती मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काटेवाडी मतदान केंद्रावर मतदानासाठी दाखल झाल्या आहेत. अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत. श्रीनिवास पवार, युगेंद्र पवार हे आधीपासूनच तेथील मतदान केंद्रावर आले होते.
धाराशिव जिल्हा परिषद, आणि आठ पंचायत समितीसाठी आज मतदान होत आहे. जिल्ह्यातील 11 लाख 45 हजार 888 मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी प्रशासनाने मोठी तयारी केली असून 1308 मतदान केंद्रांवर आज मतदान होणार आहे. अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर – मतदान प्रक्रियेत हुल्लडबाजी केली तर प्रभावी कायदेशीर कारवाई करणार असा इशारा छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी दिला आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी 5 हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी व होमगार्डचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
राज्यभरातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे. 7 हजार 438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदानासाठी निवडणूक यंत्रणाही सज्ज असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Zilla Parishad Election : महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअतंर्गतच्या 125 पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक आज पार पडत असून थोड्याच वेळात मतदानाला सुरूवात होणार आहे. आधी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होतं, मात्र ते पुढे ढकलून 7 तारेखला मतदान तर 9 फेब्रुवारी (सोमवार) मतमोजणी पार पडणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे. आज जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक पार पडत आहे. यंदा 7 हजार 438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. संपूर्ण मिळून एकूण 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 मतदार मतदानाचा अधिकार बजावतील. संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी असलेल्या 25 हजार 471 मतदान केंद्रांची संख्या लक्षात घेऊन पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे.