Video : आसाममध्ये पुराचं थैमान, 33 जिल्हेबाधित, 70 जणांचा मृत्यू

| Updated on: Jun 20, 2022 | 11:12 AM

Assam Flood : आसाम राज्याला महापूराचा मोठा फटका

Video : आसाममध्ये पुराचं थैमान, 33 जिल्हेबाधित, 70 जणांचा मृत्यू
Follow us on

आसाम: आसाम राज्याला महापूराचा (Assam Flood) मोठा फटका बसला आहे. 33 जिल्हे महापुरामुळे बाधित झाली आहेत. महापुरामुळे तब्बल 42 लाख नागरिकांचे हाल होत आहेत. आतापर्यंत आसाममध्ये 70 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. एनडीआरएफ (NDRF) आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. तर काही जणांचा भूस्खलनामध्ये मृत्यू झाला आहे.

सध्या पावसाचा जोर वाढतोय. अश्यात आता आसाममध्ये पूर आलाय. तसंच भूस्खलनाच्याही घटना घडत आहेत. यात आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाला आहे. मागच्या 24 तासात आठ जणांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. बारपेटा आणि करीमगंज जिल्ह्यात प्रत्येकी दोन, दारंग, हैलाकांडी, नलबारी आणि सोनितपूर जिल्ह्यात प्रत्येकी एक जण अद्याप बेपत्ता आहेत.

कुठे-कुठे पुरस्थिती?

बजाली, बक्सा, बारपेटा, बिस्वनाथ, बोंगाईगाव, कचार, दारंग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगढ, दिमा हासाओ, गोलपारा, होजाई, कामरूप, कामरूप, कार्बी आंगलाँग पश्चिम, करीमगंज, कोकराज, 32 जिल्ह्यांतील सुमारे 31 लाख लोक पुरामुळे अस्वस्थ आहेत. तसंच लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, नलबारी, शिवसागर, सोनितपूर, शिवसागर, दक्षिण सलमारा, तामुलपूर, तिनसुकिया, उदलगुरी या भागात महापुराचा फटका बसला आहे.

बारपेटा जिल्ह्यात 7.31 लाखांहून अधिक लोक बाधित आहेत. दारंग जिल्ह्यात 3.54 लाख, बजालीमध्ये 3.52 लाख, नागावमध्ये 2.41 लाख, गोलपारामध्ये 2.21 लाख, कामरूपमध्ये 2.18 लाख, नलबारीमध्ये 1.65 लाख, लाखीमपूरमध्ये 1.14 लाख लोक बाधित झाले आहेत. , होजईमध्ये 1.25 लाख आणि बोंगईगावमध्ये 1.13 लाख लोकांच्या जगण्यावर या पुराचा परिणाम झाला आहे.

आसाम शिवाय मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि शेजारील देश भूतानमध्ये मुसळधार पाऊस होतोय. त्यामुळे सर्व प्रमुख नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत आहे. अनेक नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत. बेकी, मानस, पगलाडिया, पुथिमारी, कोपिली, जिया-भरली आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहे.