माझी ड्युटी संपली, आता विमान नाही चालवणार… विमानतळावर प्रवाशांना सोडून एअर इंडियाच्या पायलटची सरळ कल्टी !

Air India : लंडनहून दिल्लीला जाणारी एअर इंडियाची फ्लाइट तीस तासांसाठी जयपूर एअरपोर्टवरच उभी होती. फ्लाइटच्या पायलटच्या एका निर्णयामुळे कित्येक प्रवासी अनेक तास तिथेच खोळंबले होते.

माझी ड्युटी संपली, आता विमान नाही चालवणार... विमानतळावर प्रवाशांना सोडून एअर इंडियाच्या पायलटची सरळ कल्टी !
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 26, 2023 | 10:44 AM

जयपूर : एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये (Air India) सध्या अनेक अजब-गजब घटना घडताना समोर येत आहे. कधी पॅसेंजर क्रू मेंबर्ससोबत (crew members) नीट वागत नाहीत तर कधी एअर इंडियाच्या स्टाफच्या (staff) वागण्यामुळे अडचण उद्भवते. आता असाच एक नवा मामला समोर आला आहे, ज्यामुळे एअर इंडियासमोर लाजिरवाणी परिस्थिती उद्भवली आहे.

खरंतर लंडनहून दिल्लीला येणारी एका फ्लाईट जयपूर एअरपोर्टवर मध्येच सोडून वैमानिक अर्थात पायलट निघूनच गेला. आपले ड्युटी अवर्स (कामाची वेळ) संपल्यामुळे आता विमान उडवणार नसल्याचे त्याने नमूद केले. कित्येक तास वाट पाहिल्यानंतरही विमानाचे उड्डाण होऊ शकले नाही अन् अखेर प्रवाशांना रोड ट्रॅव्हल करून दिल्लीला यावे लागले.

खराब हवामानामुळे डायव्हर्ट केली होती फ्लाईट

दिल्ली येथे काल पडत असलेल्या पावसामुळे आणि ढगांमुळे अडचण आल्याने काल बरीचशी विमाने डायव्हर्ट करण्यात आली होती. लंडनहून दिल्ली येथे येणाऱ्या एअर इंडियाच्या AI-112 विमानालाही दिल्ली एअरपोर्टवर उतरण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे हे विमान जवळजवळ १० मिनिटे हवेतच घिरट्या घालत होते. अखेर काही वेळानंतर या विमानाला जयपूरच्या दिशेने वळवण्यात आले.

विमान चालवण्यास पायलटने दिला नकार

मिळालेल्या माहितीनुसार, साधारण दोन तासांनी दिल्ली एअरपोर्टकडून क्लिअरन्स मिळाल्यानंतर एकेक फ्लाइट त्यांच्या मार्गाने रवाना झाल्या. मात्र लंडनहून दिल्ली येथे जाणारे AI-112
विमान तीन तास तेथेच उभे होते. त्याचे कारण म्हणजे पायलटने फ्लाइट सुरू करण्यास दिलेला नकार. आपली ड्युटी (कामाची वेळ) संपल्याचे सांगत त्याने पुढे काम करण्यास नकार दर्शवला आणि तो खाली उतरून निघून गेला.

अखेर दुपारी झाले विमानाचे उड्डाण

पायलटच्या या सरकारी खाक्यामुळे विमान बराच काळ तेथे विमानतळावरच उभे होते. त्यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. तब्बल पाच तास ते तिथेच अडकले होते. अखेर काही प्रवाशांना रस्तामार्गे दिल्लीला पाठवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या क्रू मेंबर्सची व्यवस्था करून उरलेल्या प्रवाशांना विमानातून दिल्लीपर्यंत पोचवण्यात आले. या सगळ्या सावळ्या गोंधळामुळे जे विमान पहाटे चार वाजता दिल्लीला पोहोचणे अपेक्षित होते, त्याने अखेर दुपारी दोन वाजता जयपूर विमानतळावरून हवेत पुन्हा झेप घेतली.

यासंदर्भात एका प्रवाशाने ट्विट करून त्याची नाराजीही व्यक्त केली.