वांग्याचं भरीत बनलं काळ, तिघा सख्ख्या बहिणींचा मृत्यू,एका गोष्टीने पोलिसांना आला संशय..
आदल्या रात्री वांग्याचे भरीत आणि रोटी खाल्ल्यानंतर या तिघी बहिणी अत्यवस्थ झाल्या. त्यामुळे त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे मुलींच्या पालकांनी म्हटले आहे. मात्र, पोलीसांना एका गोष्टीने संशय आला....

काही महिन्यांपूर्वी मुंबईतील भायखळ्यात कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील तिघा जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. आता तीन सख्ख्या बहिणींचा वांग्याचे भरीत खाल्ल्याने संशयास्पद पद्धतीने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कुटुंबियांनी दावा केला आहे की वांग्याचे भरीत आणि रोटी खाल्ल्यानंतर तिघींची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. मुलींच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, आदल्या रात्री वांग्याचे भरीत आणि रोटी खाल्ल्यानंतर या तिघी बहिणी अत्यवस्थ झाल्या. मात्र,याच अन्नपदार्थांमुळे अवघ्या नऊ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्यावर पोलिसांना संशय आला.
मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.येथील मातगुवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिपोरा खुर्द गावाची ही घटना आहे. या प्रकरणात तिघी बहिणींनी वांग्याचे भरत खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. मात्र, कुटुंबियांनी या मुलींचे पोलिसांना न कळवता दफन केल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
पिपोरा खुर्द गावातील सात वर्षांची पूनम, तीन वर्षांची मनिषा आणि अवघ्या ९ महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह आता कबरीतून बाहेर काढले जाणार आहे. त्यानंतर त्यांचे पोस्टमार्टेम केले जाणार आहे. यानंतरच या प्रकरणातील नेमका मृत्यू कसा झाला याची माहिती उघडकीस येऊ शकते असे म्हटले जात आहे. या संदर्भात मातगुवा पोलीस ठाण प्रमुख अंकुर चौबे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिस प्रशासनाने मृतदेहांना बाहेर काढण्याची कारवाई करण्यासाठी प्रशासनाची मंजूरी मागितली आहे, त्या मुलींच्या मृत्यूचे कारण त्यामुळे नक्की फूड पॉयझन की अन्य काही होते याची माहिती उघडकीस येण्यास मदत होणार आहे.