6 कोटीचं स्टेशन… पण आजपर्यंत एकही ट्रेन थांबली नाही; लोक म्हणतात, रात्री वाटते भीती…

भोपाळमधील ६ कोटी रुपये खर्चून बांधलेले निशांतपुरा रेल्वे स्टेशन उद्घाटनानंतरही ओसाड आहे. येथे एकही ट्रेन थांबत नाही आणि कर्मचारीही नाहीत. रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे हे स्थानक असूनही प्रवाशांना सुविधा मिळत नाहीत, त्यामुळे स्थानिकांना रात्रीच्या वेळी भीती वाटते आणि ते याला 'भूतिया स्टेशन' संबोधू लागले आहेत.

6 कोटीचं स्टेशन... पण आजपर्यंत एकही ट्रेन थांबली नाही; लोक म्हणतात, रात्री वाटते भीती...
Nishatpura Station
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 15, 2026 | 7:00 PM

भोपाळचे निशातपुरा रेल्वे स्टेशन 6 कोटी रुपये खर्च करून बनवलं गेलं आहे. आता रेल्वे विभागाच्या निष्काळजीपणामुळे हे रेल्वे स्टेशन ओसाड बनण्याच्या मार्गावर आहे. या रेल्वे स्थानकाचं थाटात उद्घाटनही झालं. पण प्रवाशांसाठी अजूनपर्यंत सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. उद्घाटनाला दोन वर्ष झाल्यानंतरही या स्टेशनमध्ये कोणताच स्टाफ तैनात करण्यात आलेला नाही. तसेच ट्रेन थांबण्याचं शेड्यूलही तयार करण्यात आलेलं नाही. त्यामुळे हे स्टेशन म्हणजे ओसाड स्टेशन वाटत आहे.

या स्थानकावर प्लॅटफॉर्म, शेल्टर, बेंच आणि लायटिंग आदी नेहमीच्या सुविधा आहे. पण तरीही प्रवासी त्याचा लाभ घेऊ शकत नाही. हे स्टेशन दिवसभर सुनसान असतं. रात्री तर या ठिकाणी सन्नाटा पसरलेला असतो. त्यामुळे स्थानिक लोक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. लोक आता या स्थानकाला भूतिया स्टेशन म्हणून संबोधू लागले आहेत.

लोकांच्या मनात रातीची भीती

स्थानिक लोकांनी या स्टेशनबाबत प्रतिक्रिया दिली आहे. रात्रीच्यावेळी या ठिकाणचं वातावरण भीतीदायक होतं. त्यामुळे लोक या स्थानकावरून वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा करत आहेत, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनीही सुद्धा रात्री या ठिकाणचं वातावरण बदलून जात असल्याचं म्हटलं आहे. भोपाळ डिव्हिजनच्या एका कर्मचाऱ्याच्या मते, ट्रेन, स्टाफ आणि प्रवाशी नसताना रात्री हे स्टेशन भीतीदायक वाटतं. स्थानकावर जायला भीती वाटते. दरम्यान, लोक काही म्हणत असले तरी हे स्टेशन भूतिया स्टेशन नाही. त्यावर कुणीही अधिकृतपणे काही निवेदन दिलेलं नाही. स्टेशन रात्रीच्या वेळी रिकामं असतं. एकटं जाण्यास लोकांना भीती वाटते. बाकी या पलिकडे काही नसल्याचं काहींचं म्हणणं आहे.

वर्दळ वाढली तर…

स्थानिक व्यापाऱ्यांच्या मते, स्टेशन पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास या ठिकाणी चांगली कनेक्टिव्हिटी तयार होईल. स्थानिक व्यवसायांना फायदा होईल. तसेच विविध प्रकारच्या अफवांना पूर्णविराम बसेल. या स्थानकात पुरेसा स्टाफ दिला पाहिजे. या ठिकाणी रेल्वे थांबल्या पाहिजे. वर्दळ वाढली तर स्टेशनबाबतच्या नकारात्मक गोष्टीही निघून जातील, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

शेड्यूलच तयार नाही

2024मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते या स्थानकाचं लोकार्पण करण्यात आलं होतं. हे स्टेशन बनवण्यासाठी 6 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या आधुनिक रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म, वेटिंग रुम, लायटिनिंग आणि प्रवाशांसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. तरीही या ठिकाणी कोणतीही ट्रेन थांबत नाही. ट्रेन थांबण्याचं शेड्यूलच तयार करण्यात आलेलं नाही. तसेच या ठिकाणी कोणताच स्टाफ तैनात करण्यात आलेला नाही. ट्रेनच थांबत नसल्याने प्रवासांची ये-जाही बंद झालेली आहे. त्यामुळे रेल्वेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहेत.

Follow Us