विश्व मांगल्य सभेच्या उत्तर भारत प्रबोधन बैठकीला 23 जुलैला सुरुवात, सरसंघचालक मोहन भागवत साधणार विशेष संवाद
विश्व मांगल्य सभेची उत्तर भारत प्रबोधन बैठक येत्या 23 आणि 24 जुलै रोजी दिल्लीत होणार आहे. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देशातील मातृशक्तिसोबत विशेष संवाद साधणार आहेत.

विश्व मांगल्य सभेची उत्तर भारत प्रबोधन बैठक येत्या 23 आणि 24 जुलै रोजी दिल्लीत होणार आहे. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे देशातील मातृशक्तिसोबत विशेष संवाद साधणार आहेत. विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय संगठन मंत्री वृषाली जोशी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे. विश्व मांगल्य सभेची स्थापना 19 जानेवारी 2010 रोजी नागपूरमध्ये झाली. विश्व मांगल्य सभा ही महिला सक्षमीकरण, कुटुंब आणि सामाजिक जागृतीच्या क्षेत्रात गेल्या 16 वर्षांपासून कार्यरत असलेली एक देशव्यापी संघटना आहे. “ना मतु परा देवतम्” हे या संघटनेचे मुख्य ब्रीदवाक्य आहे, ज्याचा अर्थ “आईपेक्षा मोठा देव नाही” असा होतो, अशी माहिती यावेळी वृषाली जोशी यांनी दिली.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, या वर्षी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मातृत्वा सारख्या महत्त्वाच्या विषयावर महिलांशी संवाद साधणार आहेत. त्यांचं एक व्याख्यान दिल्लीतील प्रतिष्ठित डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात, तर दुसरे व्याख्यान दक्षिण भारतातील हैदराबाद येथील सेवालाल बंजारा भवन येथे होणार आहे. उत्तर भारत प्रबोधन बैठकीचं आयोजन येत्या 23 आणि 24 जुलै रोजी नवी दिल्लीमधील विश्व युवक केंद्र चाणक्यपुरी येथे करण्यात आलं आहे. दर दक्षिण भारत प्रबोधन बैठकीचं आयोजन 25 आणि 26 जुलै रोजी हैदराबादमध्ये होणार आहे. उत्तर भारत प्रबोधन बैठकीमध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागातून जवळपास 280 महिला सहभागी होणार आहेत, अशी माहिती जोशी यांनी दिली आहे.
24 जुलै रोजी आंबेडकर भवनात विशेष कार्यक्रम
24 जुलै रोजी सकाळी विश्व युवक केंद्रामध्ये डॉ. मोहन भागवत यांच्यासोबत कार्यकर्त्यांची सभा आणि प्रबोधन सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता नवी दिल्लीतील जनपथ येथील आंबेडकर भवनमध्ये देशातील प्रबुद्ध महिलांसोबत एक विशेष संवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम अंदाजे दोन ते अडीच तासांचा असेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात हा कार्यक्रम ऐतिहासिक आहे. या वर्षी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मातृत्वा सारख्या महत्त्वाच्या विषयावर महिलांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात प्रश्नोत्तराच्या सत्राचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात 1300 पेक्षा अधिक महिला सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती यावेळी वृषाली जोशी यांनी दिली आहे.
