
अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे सध्या मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या या तणावाचा संपूर्ण जगालाच मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण यामुळे भीषण इंधन टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे सध्या जगभरात चिंतेचं वातावरण आहे. त्यातच इराणच्या इस्लामिक सिव्होल्यूशनरी गार्ड कोर (IRGC) कडून बुधवारी मोठी घोषणा करण्यात आली होती. चीन वगळता इतर सर्व देशांसाठी होर्मुजची सामुद्रधुनी वाहतुकीसाठी बंद राहील, जर या सामुद्रधुनीमधून चीन सोडता अन्य कोणत्याही देशाच्या तेलाचं जहाज गेलं तर आम्ही त्यावर मिसाईल हल्ला करू, असं इराणने म्हटलं होतं. याचा मोठा फटका हा भारताला देखील बसणार होता, कारण जगभरात जेवढी कच्च्या तेलाची गरज आहे, त्यातील तब्बल 25 टक्के तेलाची वाहतूक याच होर्मुजच्या सामुद्रधुनीमधून होते.
मात्र आता भारतासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे, इराणने आपला निर्णय बदला आहे. आपल्या नव्या निर्णयामध्ये इस्लामिक सिव्होल्यूशनरी गार्ड्सने म्हटलं आहे की, होर्मुजची सामुद्रधानी आता इस्रायल,अमेरिका, युरोपीयन देश आणि इस्रायल व अमेरिकेचे सहयोगी देश यांच्यासाठीच बंद असेल, इतर देशांना या मार्गाने वाहतूक सुरू ठेवण्यास इराने परावानगी दिली आहे. दरम्यान हा भारतासाठी मोठा दिलासा मानला जात आहे, कारण आता चीन प्रामाणेच भारत देखील या मार्गाने इंधनाची वाहतूक करू शकणार आहे. त्यामुळे देशात संभाव्य इंधन टंचाईचा धोका कमी झाला आहे.
इराणने या मार्गाविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना असं देखील म्हटलं आहे की, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार युद्धकाळात हा मार्ग बंद करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील मोठी घोषणा केली होती. अमेरिकेचं सैन्य या मार्गाला सुरक्षा पुरवेल मी जगाला शब्द देतो की कोणत्याही देशात इंधन टंचाई निर्माण होणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता इरानने भारतासाठी हा मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे भारतात येणारा इंधन पुरवठा सुरळीत सुरू राहण्याची शक्यता आहे.