
संपूर्ण देशात सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे अधिकारी दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात आयोगाने विविध राजकीय पक्षांसोबत बैठका घेतल्या. यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, बिहारमधील एसआयआर पूर्णपणे यशस्वी झाला आहे. तसेच बिहारमधील निवडणुका 22 नोव्हेंबरपूर्वी होतील अशी घोषणाही त्यांनी केली.
ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, मतदारांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यासाठी आयोगाने तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. बूथवर गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी खास नियोजन करण्यात आले आहे. कोणत्याही बूथवर 1200 पेक्षा जास्त मतदार राहणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे. आता बूथवर मोबाईल फोन नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिंग एजंटना बूथ सेंटरपासून 100 मीटर अंतरावर बसण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पुढे बोलताना ज्ञानेश कुमार म्हणाले की, EVM मशीनवर उमेदवारांचे रंगीत छायाचित्र असेल. तसेच सर्व बूथवर निवडणूक प्रक्रिया लाईव्ह-स्ट्रीम केली जाईल. मतदार यादीतील सर्व माहिती स्पष्ट दिलेली असेल. निवडणूक आयोगाने वन-स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला आहे जो जनतेला सर्व प्रकारची माहिती देईल. बिहारमध्ये एसआयआर पूर्णपणे यशस्वी झाला आहे. आता बिहारनंतर तो देशभरात राबविला जाणार आहे.
मतदार यादीत एकाच घर क्रमांकावर अनेक मतदारांची नावे आहेत, तसेच काहींचा घर क्रमांक शून्य असा आहे. यावर बोलताना निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, अनेक लोकांकडे घरे नाहीत. म्हणूनच त्यांचे घर क्रमांक शून्य असे लिहिले आहेत. जर कोणत्याही पक्षाला असे वाटत असेल की कोणताही पात्र मतदार वगळण्यात आला आहे किंवा यादीत अपात्र मतदार आहेत, तर ते त्यासाठी अर्ज करू शकतात.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज बिहारच्या जनतेला आगामी निवडणूकीत मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. बिहार दौऱ्यात ज्ञानेश कुमार यांच्यासोबत एस.एस. संधू आणि विनीत जोशी हे अधिकारी हजर होते.