
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले आहे. येत्या काही दिवसांत सरकार स्थापन केले जाणार आहे. अद्याप मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा करण्यात आलेले नाही. यासाठी एनडीएतील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठका सुरू झाल्या असून विविध नावांवर चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार याबाबतही चर्चा सुरू आहे. यासाठी एक फॉर्म्युला समोर आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 89 जागा जिंकल्या आहेत, तर जेडीयूने 85 ने 85 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता भाजपला जास्त मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सहा आमदारांमागे एक मंत्रिपद वाटले जाण्याची शक्यता आहे. यावर घटक पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. आता आगामी काही दिवसांमध्ये याबाबत सविस्तर घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
एनडीएमधील सर्वच पक्षांना चांगले यश मिळाले आहे. आता सर्व पक्ष आपापली बैठक घेणार असून त्यात आपला विधिमंडळ पक्षनेता निवडणार आहेत. यानंतर एनडीएची एक विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. या बैठकीत एनडीए विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाईल. त्यानंतर शपतविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि एनडीए/भाजपशासित राज्य सरकारांचे मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. शपथविधी सोहळ्याच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.
एनडीएच्या शानदार वियजानंतर आता बिहारमध्ये शपथविधी सोहळा कधी होणार या प्रश्नावर बोलताना केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी सांगितले की, ‘लवकरच सरकार स्थापन होईल. चर्चा सुरू आहे. आज रात्रीपर्यंत मी वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांशीही बोलेन आणि मंत्रिमंडळाचा आराखडा आज किंवा उद्यापर्यंत तयार होईल. 22 नोव्हेंबरपूर्वी सरकार स्थापन करायचे आहे. ते आम्ही करू.’