जातीयवादी राजकारण करणाऱ्यांना बिहारच्या जनतेने आरसा दाखवला, PM मोदींचा हल्लाबोल
PM Modi : भाजपप्रणित एनडीए आघाडीने बिहारमधील विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये बोलताना विरोधकांवर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आघाडीने शानदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान मोदी सध्या गुजराज दौऱ्यावर आहेत. सुरतमधील एका सभेत बोलताना मोदींनी म्हटले की, अनेक जातीयवादी नेते बिहारमध्ये जाणून जातीवर आधारित भाषणे देत होते. याद्वारे ते जातीवादाचे विष पसरवत असत. त्यांना वाटत होते की यामुळे त्यांना यश मिळेल, मात्र यावेळी बिहारने त्यांना आरसा दाखवला असून जातीवादाचे विष नाकारले आहे. हा देशासाठी अतिशय उज्ज्वल संदेश आहे.
पंतप्रधान मोदांनी पुढे बोलताना वक्फ कायद्यावर बोलताना म्हटले की, ‘बिहारमध्ये जमीन आणि घरांवर बेकायदेशीरपणे कब्जा करण्यात आला आणि नंतर वक्फ मालमत्तेत रूपांतरित केली गेली. तामिळनाडूमध्येही हजारो वर्षे जुन्या गावांना वक्फ मालमत्ता घोषित करण्यात आली. यामुळे संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यानंतर आम्ही वक्फबाबत कायदा मंजूर केला, त्यामुळे आता गैरप्रकार थांबणार आहे.’
बिहारच्या जनतेने जातीयवाद नाकारला
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, बिहार निवडणुकीदरम्यान अनेक तेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक ठिकाणी वक्फ कायदा फाडत आम्ही जिंकल्यावर वक्फ कायदा लागू होऊ देणार नाही असे आश्वासन दिले. मात्र बिहारच्या लोकांनी या जातीय विषाला पूर्णपणे नाकारले आहे. तसेच गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वरिष्ठ नेते नितीश कुमार यांचा अपमान करत आहेत. ते अपमानास्पद भाषा वापरत आहेत. मात्र बिहारच्या जनतेने हे स्वीकारले नाही.
दलित समाजाचा एनडीएला पाठिंबा
PM मोदी पुढे बोलताना म्हणाले की, विरोधकांबाबतच्या द्वेशाचे वातावरण या निवडणुकीत दिसून आले. सर्व मतदारांनी एनडीए आणि त्यांच्या मित्रपक्षांना अभूतपूर्व पाठिंबा दिला आहे. दलित समुदायाचे वर्चस्व असलेल्या 38 पैकी 34 जागा एनडीएने जिंकल्या आहेत. यातून हे स्पष्ट होत आहे की, विरोधकांनी पसरवलेल्या खोट्या गोष्टींना दलित समुदायाने नाकारले आहे.
काँग्रेसवर टीका
आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की, ‘देशाने मुस्लिम लीग-माओवादी काँग्रेस (एमएमसी) ला नाकारले आहे. एकेकाळी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी सारख्या व्यक्तींनी नेतृत्व केलेल्या काँग्रेस पक्षातील लोक या नेत्याच्या कृतीने दुःखी आहेत. आता काँग्रेस पक्षाला कोणीही वाचवू शकत नाही. 50-60 वर्षे राज्य करणाऱ्यांना पक्षाला एक-दोन दशकांतच अशा प्रकारे नष्ट करावे, हा त्यांच्यासाठी आत्मपरीक्षणाचा विषय आहे.’
