अमेरिकेनं जसं ओसामाला मारलं तसं भारत हाफीजला मारू शकतो का? निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने काय सांगितलं?
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्मान झालं आहे.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्मान झालं आहे. युद्ध झाल्यास काय होऊ शकतं? भारतानं पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानवर कशा पद्धतीनं दबाव वाढला? ज्या पद्धतीनं अमेरिकेनं ओसामा बिन लादेनला मारलं, त्या पद्धतीनं भारत हाफीजला मारू शकतो का? या सर्व प्रश्नांना निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी उत्तरं दिली आहेत, जाणून घेऊयात ते नेमकं काय म्हणाले.
पाकिस्तानवर दबाव वाढला आहे, भारत हल्ला करू शकतो अशी दहशत पाकिस्तानमध्ये निर्माण झाली आहे. नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रश्नावर उत्तर देताना महाजन यांनी म्हटलं आहे की, नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवले जातात. सायरन वाजला की नागरिक अंडर ग्राउंड पार्किंगमध्ये येतात. ही हवाई हल्ल्यापासून वाचण्याची पद्धत आहे. पाकिस्तानवर प्रचंड दबाव आहे, त्यांना वाटतं हवाई हल्ला लगेचच होईल. इतिहासात कधीही रात्रीच्या दोन वाजता पत्रकार परिषद घेतली गेली नव्हती. जगामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असं महाजन यांनी म्हटलं आहे.
भारताच्या भीतीनं पाकिस्ताननं लश्कर ए तोयबाचा प्रमुख हाफीज सईदची सुरक्षा वाढवली आहे. हाफीज पाकिस्तानसाठी किती महत्वाचा आहे, लादेनला जस अमेरिकेनं मारलं तसं भारत हाफीजला मारेल का ?
या प्रश्नावर उत्तर देताना महाजन यांनी म्हटलं की, हाफीज सईदला पाकिस्तानात व्हीआयपी समजलं जातं. हाफिजला मारण्याची क्षमता आपल्याकडे आहे. आपण जी पावलं टाकली त्यामुळे पाकिस्तानवर आर्थिक दबाव वाढत आहे. त्यांची रडार्स ऑन झालेले आहेत, त्यांचा खर्च वाढतोय, अरबी समुद्रात बोटीने गस्त घातली जात आहे, त्याचाही खर्च वाढत आहे. विमानाने जपानला जायचं असेल तर लांबून जावं लागत आहे, त्याचाही खर्च वाढत आहे. आंतरराष्ट्रीय विमानं पाकिस्तानच्या एअरपोर्टवर येने पूर्णपणे बंद झाले आहेत. पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत 350 रुपये झाली आहे, असंही महाजन यांनी यावेळी सांगितलं.
