घरात कॉकरोचचं काय काम? भाजपने आरोप फेटाळले; सीजेपीकडून 48 तासांची मुदत

जयपूरमध्ये सीजेपी (कॉकरोच जनता पार्टी) कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. शाळेची पाहणी करायला गेलेल्या कार्यकर्त्यांना ग्रामस्थांनी हुसकावून लावले. सीजेपीने यामागे भाजपचा हात असल्याचा दावा केला, तर भाजपने 'घरात कॉकरोचचं काय काम?' असे म्हणत आरोप फेटाळले. काँग्रेसने घटनेचा निषेध करत शाळांच्या दुर्दशेवर बोट ठेवले आहे.

घरात कॉकरोचचं काय काम? भाजपने आरोप फेटाळले; सीजेपीकडून 48 तासांची मुदत
Rajasthan Jaipur CJP
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 21, 2026 | 6:28 PM

जयपूरमध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना गावकऱ्यांनी पळवून पळवून मारले. इतकेच नाही तर सीजेपीचे नेते आशुतोष रांका यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. रांका यांनी तर हा हल्ला भाजपच्या गुंडांनीच केल्याचा आरोप केला आहे. अभिजीत दीपके यांनीही या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. आता त्यावर भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे. हा हल्ला आम्ही केला नाही, असं सांगतानाच घरात कॉकरोचचं कामच काय? असा सवाल भाजपच्या आमदाराने केला आहे.

जयपूरच्या बगरू विधानसभा क्षेत्रातील रामपुरा-कंवरपुरा येथील सरकारी प्राथमिक शाळेत सीजेपीचे कार्यकर्ते पाहणी करण्यासाठी गेले होते. विद्यार्थ्यांना म्हशीच्या तबेल्यात बसवलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी या शाळेकडे मोर्चा वळवला. पण तिथे गेल्यावर ग्रामस्थांनी त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांना मारहाण केली. तसेच पळवून पळवून मारलं. आशुतोष रांका यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. रांका यांच्या मते ग्रामस्थांनी त्यांचे कपडे फाडले. त्यानंतर या ग्रामस्थांनी सीजेपी कार्यकर्त्यांच्या विरोधात धरणं आंदोलन करून सीजेपी कार्यकर्त्यांनाच दोषी धरण्याचा प्रयत्न केला. रांका यानी हा हल्ला भाजपच्या गुंडांनी केल्याचा आरोप केला होता.

 

काँग्रेस मुखवटा घालून फिरतेय

भाजपचे आमदार गोपाल शर्मा यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. घरात कॉकरोचचं काहीच काम नाही, असं त्याने म्हटलं आहे. सीजेपी काय आहे? कॉकरोचच बदललं बोलत आहे. घरात कॉकरोचचं काहीच महत्त्व नाही. घरात मुलांचं महत्त्व आहे. घरात तरुणांना महत्त्व आहे. आमच्या इतिहासातील सर्वात मोठा जेनजी खुदीराम बोस आहेत, असं गोपाल शर्मा म्हणाले. राजस्थानचे मंत्री जवाहर सिंह बेढम यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने सीजेपीचा मुखवटा घातला आहे आणि लोक त्यांना उत्तर देत आहेत. काँग्रेसवाले वेगवेगळे मुखवटे घालून गावात जातात आणि तिथे जाऊन शांतता भंग करतात. लोक त्यांना उत्तर देत आहेत. काँग्रेसला कोणी विचारत नाही. त्यामुळेच ते कुणाचा तरी मुखवटा घालून जातात, असं जवाहर सिंह बेढम म्हणाले.

काँग्रेसची टीका

दरम्यान काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते टीकाराम जूली यांनी या हिंसेचा निषेध नोंदवला आहे. कोणत्याही परिस्थितीत हिंसा सहन केली जाणार नाही. सरकारी शाळांची वास्तव परिस्थिती लोकांच्या समोर आली पाहिजे. सरकार शाळांची वाईट परिस्थिती लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप टीकाराम जूली यांनी केली आहे.

48 तासांची मुदत

दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीने (CJP) राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांना जयपूरमध्ये शाळेच्या पाहणी दरम्यान आपल्या स्वयंसेवकांवर झालेल्या कथित हल्ल्यात सहभागी असलेल्यांना 48 तासांत अटक करण्याची डेडलाईन दिली आहे. कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा देतानाच सीजेपीने दिलावर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचा इशाराही दिला आहे.

सीजेपी कार्यकर्त्यांना हुसकावलं

माहितीनुसार, सीजेपी कार्यकर्ते गावात येण्याच्या आधीच ग्रामस्तांनी गावातील मुख्य रस्त्यावर बॅरिकेड लावले होते. गावात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी ग्रामस्थ आणि सीजेपी कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यामुळे गावकऱ्यांनी सीजेपी कार्यकर्त्यांना हुसकावून लावलं. त्यानंतर ग्रामस्थांनी शाळेच्या बाहेर धरणे आंदोलन केलं आणि सीजेपीच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, शाळेच्या दुरुस्तीसाठी सरकारने निधी दिला आहे. त्यामुळे शाळेच्या डागडुजीचं काम सुरू होणार असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us