CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश
20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर मोर्चा काढला होता. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, दरम्यान याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, यावर न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे.

20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर मोर्चा काढला होता. शिक्षणं मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह आपल्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला, दरम्यान यावेळी आंदोलक आणि पोलीस आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्यासाठी आश्रुधुराचा मारा करण्यात आला, तसेच लाठीचार्ज देखील करण्यात आला, या घटनेत अनेक आंदोलक विद्यार्थी जखमी झाले. त्यापूर्वी जंतर -मंतरवर आमरण उपोषणासाठी बसलेल्या सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज आणि सोनम वांगचूक यांच्या मुद्द्यावर दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर चीफ जस्टिस देवेंद्र उपाध्याय आणि जस्टिस तेजस कारिया यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावर आता हाय कोर्टाकडून मोठा आदेश देण्यात आला आहे.
या प्रकरणात दिल्ली हाय कोर्टाकडून दिल्ली पोलिसांना नोटीस जारी करण्यात आली आहे. चार आठवड्याच्या आत उत्तर द्यावं असं न्यायालयाने या नोटीसमध्ये म्हटलं आहे. दरम्यान त्यानंतर पुढील चार आवड्यानंतर पोलिसांच्या उत्तरावर याचिकाकर्त्यांकडून प्रत्युत्तर दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान पोलिसांनी कॅमेरा आणि सीसीटीव्ही फुटेज जतन करावं असा आदेश देखील हाय कोर्टाकडून पोलिसांना देण्यात आला आहे.
दुसरीकडे नीट पेपर फुटीप्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी सोनम वांगचूक यांचं दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आमरण उपोषण सुरू होतं. उपोषणाच्या 21 व्या दिवशी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांची ही कारवाई बेकायदेशीर ठरवण्यात यावी अशी देखील एक जनहीत याचिका दिल्ली हाय कोर्टात दाखल करण्यात आली होती, मात्र ही याचिका हाय कोर्टाने फेटाळून लावली आहे. दरम्यान दिल्ली हाय कोर्टाच्या आदेशानंतर आता दिल्ली पोलिसांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने सोमवारी संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले होते. या मोर्चावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून, यामुळे संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.