सीजेपीच्या कार्यकर्त्यांना पकडून पकडून मारलं, आशुतोष रांकांना धक्काबुक्की; दीपके भडकले
जयपूरमधील बगरू येथील रामपुरा-कंवरपुरा गावात कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सरकारी शाळेची पाहणी करताना ग्रामस्थांनी हुसकावून लावले व मारहाणीचा आरोप झाला. शाळेची इमारत जीर्ण असल्याने विद्यार्थी म्हशीच्या तबेल्यात शिकत आहेत. CJP ने भाजपवर टीका केली, तर ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले. यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

राजस्थानची राजधानी जयपूरमधील बगरू येथील रामपुरा-कंवरपुरा गावात सरकारी शाळांची व्यवस्था पाहण्यासाठी आलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना येथील ग्रामस्थांनी हुसकावून लावलं आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी सीजेपीच्या विरोधात आंदोलनही सुरू केलं. या घटनेमुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. तर, सीजेपीचे आशुतोष रांका यांनाही धक्काबुक्की करण्यात आली आहे. या सर्व प्रकारावर आशुतोष रांका यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. सीजेपी कार्यकर्त्यांना भाजपच्या गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप रांका यांनी केला आहे.
आज सकाळी सीजेपीचे कार्यकर्ते रामपुरा-कंवरपुरा गावात प्राथमिक शाळेची पाहणी करण्यासाठी गेले होते. याची कुणकुण ग्रामस्थांना लागल्यानंतर त्यांनी शाळेत धडक दिली. यावेळी गावकऱ्यांनी सीजेपी कार्यकर्त्यांना जोरदार विरोध केला. त्यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यांना गावातून हाकलून लावलं. या गावकऱ्यांनी सीजेपीच्या कार्यकर्त्यांना पकडून पकडून मारलं. तसेच आशुतोष रांकाशीही धक्काबुक्की केली. त्यानंतर या गावकऱ्यांनी सीजेपीच्या विरोधात उलटं धरणे आंदोलनही सुरू केलं. त्यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
यह वहाँ के गाँव वाले नहीं भाजपा के बुलाये हुए गुंडे है। इनका सरगना कमल प्रधान वहाँ गरीब लोगों की ज़मीन पर कब्जे का काम करता है।
बच्चों को भैंसों में तबेले में पढ़ाया जा रहा है, और यह रोकने पर भाजपा अपने गुंडे भेज रही है।
क्या शर्मनाक स्थिति है। https://t.co/8A3SeYvpHR https://t.co/Z4g4aHZXCq
— Ashutosh Ranka (@AshutoshRanka) August 21, 2026
यापेक्षा लज्जास्पद काय?
विशेष म्हणेज आशुतोष रांकाही याच शाळेत जाणार होते. त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही केली होती. रामपुरा, कंवरपुरा येथील शाळेत गेल्या काही वर्षांपासून म्हशीचे तबेले सुरू आहेत. या शाळेची पाहणी करण्यासाठी मी स्वत: जात आहे, असं आशुतोष रांका यांनी म्हटलं होतं. आमचे कार्यकर्ते शाळेची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यांना शाळेत मारहाण करण्यात आली. मुलांनी म्हशीच्या तबेल्यात शिकावं हे भाजपला मान्य आहे. पण शाळेची दुरावस्था व्यवस्थित करणं त्यांना मान्य नाही. यापेक्षा लज्जास्पद गोष्ट काय असू शकते? असा संतप्त सवाल रांका यांनी केला आहे.
शाळेची इमारत पडीक
गावातील शाळेच्या दुरावस्थेवरून आधीच नाराजी होती. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शाळेची इमारत पडीक झाली आहे. त्यामुळे मुलांना म्हशीच्या तबेल्यात शिकावं लागत आहे. त्यामुळेच सीजेपी कार्यकर्ते शाळेत पोहोचले होते. पण ग्रामस्थांनी त्यांना विरोध केला. सध्या गावात तणावाची स्थिती आहे. ग्रामस्थांचे धरणे आंदोलन सुरू आहे.
ग्रामस्थ काय म्हणाले?
ग्रामस्थ विष्णू कुमार शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या गावात आधी प्राथमिक विद्यालय इयत्ता 5 वी पर्यंत होते. शाळेला माझ्या आजोबांनी जमीन दिली होती. 1999मध्ये शाळेची इमारत तयार झाली. पण त्यानंतर शाळेच्या इमारतीची कधीच दुरुस्ती झाली नाही. शाळेची इमारत इतकी पडीक झालीय की विद्यार्थी बसून अभ्यास करू शकत नाहीये. त्यामुळे गावातील एक मोठं घर मुलांना शिकण्यासाठी दिलं आहे. दोन खोल्यांमध्ये शिक्षक 20-30 विद्यार्थ्यांना शिकवत आहेत, असं विष्णू कुमार शर्मा यांनी सांगितलं.
Ashu has been attacked by BJP goons in Rajasthan.
Ashu and other volunteers of CJP were beaten up and have been injured.@PoliceRajasthan has allowed this to happen. pic.twitter.com/pc7c3GCAfV
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) August 21, 2026
अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया
अभिजीत दीपके यांनी या घटनेवर तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आशुतोषवर भाजपच्या गुंडांनी राजस्थानात हल्ला केला. राजस्थानच्या पोलिसांनी असं करू दिलं. या हल्ल्यात आशुतोषसहीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत, अशी प्रतिक्रिया अभिजीत यांनी व्यक्त केली आहे. अभिजीत यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.