अमेरिकेतून राहुल गांधींचं आरक्षणावर भाष्य; म्हणाले, आमचं सरकार आल्यास…

Rahul Gandhi About Reservation : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावर भाष्य केलं आहे. अमेरिकेत बोलताना त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मत मांडलं. आमच सरकार आल्यास आरक्षणाबाबत निर्णय घेऊ, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

अमेरिकेतून राहुल गांधींचं आरक्षणावर भाष्य; म्हणाले, आमचं सरकार आल्यास...
राहुल गांधी, काँग्रेस नेते
Image Credit source: Facebook
| Updated on: Sep 11, 2024 | 11:09 AM

सध्या देशात आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. जातीनिहाय जनगणनेची मागणी केली जात आहे. महाराष्ट्रातही मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मोठं आंदोलन उभं केलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. राहुल गांधी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही महत्वाचं विधान केलं आहे. तसंच भारतातील आरक्षणावर भाष्य केलं. मात्र त्यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे. आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

अमेरिकेत राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. आमचा आरक्षणाला विरोध नाही. काँग्रेस पक्षाने कायमच पाठिंबा दिला आहे. 50 टक्क्यांच्या पुढे आरक्षण घेऊन जाण्याचा आमचा हेतू आहे, असं राहुल गांधी म्हणालेत. राहुल गांधी यांनी एक्स (ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केलीय. यात त्यांनी त्यांच्या विधानाचं स्पष्टीकरण दिलं आहे. काल मी जे बोललो ते चुकीच्या प्रकारे पसरवलं जात आहे. माझा आरक्षणाला विरोध असल्याचं पसरवलं जात आहे. पण मी आरक्षणाच्या विरोधात नाहीये. तर मी आरक्षणाच्या बाजूने आहे, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी काय म्हटलं होतं?

देशातील आरक्षण संपविण्याविषयी राहुल गांधी यांनी महत्वाचे वक्तव्य केलं. जेव्हा योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं राहुल गांधी काल एका कार्यक्रमात म्हणाले होते. त्यांच्या विधानावर त्यांच्या विरोधकांकडून टीका केली जात आहे. यावर आता राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आताच्या लोकसभा निवडणुकीनंतर काही लोक म्हणाले की, आता आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भीती वाटत नाही. भीती निघून गेली, असं राहुल गांधीनी म्हटलं. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांच्या भीती निर्माण केली होती. काही सेकंदात ही भीती निघून गेली. त्यांना ही भीती निर्माण करण्यासाठी अनेक वर्ष लागली. पण काही सेकंदात ही भीती पळून गेली, असं राहुल गांधी नरेंद्र मोदींविषयी म्हणाले.