
हरियाणामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभा सुरू आहे. या सभेच्या तिसऱ्या दिवशी संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबोले यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह अली खामेनेई यांच्या निधनानंतर झालेल्या विरोधाबाबत बोलताना होसबोले म्हणाले, “भारताची परंपरा अशी आहे की, एखाद्या व्यक्तीला जिवंत असताना विरोध करता येऊ शकतो, पण मृत्यूनंतर त्यांचा विरोध करणे योग्य नाही. विरोध ठीक आहे, पण तो शांततापूर्ण पद्धतीने व्हायला हवा.”
दत्तात्रेय होसबोले यांनी संघाच्या संघटनात्मक विस्ताराबाबतही माहिती दिली. ते म्हणाले की, देशभरात संघकार्याचा विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अंदमान, अरुणाचल प्रदेश आणि लेह-स्पिटी सारख्या दुर्गम आणि सुदूर भागातही संघाच्या शाखा सुरू झाल्या आहेत. अजूनही दुर्गम भागात शाखा सुरू करण्यावर संघाचा भर आहे.
#WATCH | Panipat, Haryana | RSS General Secretary Dattatreya Hosabale says, “On the occasion of the centenary of the Sangh this year, we had specifically deliberated on the programs for the centenary year… From an organisational perspective, we discussed the expansion of Sangh… pic.twitter.com/E1x8WofLz4
— ANI (@ANI) March 15, 2026
त्यांनी पुढे सांगितले की, देशात ‘पंच परिवर्तन’ यशस्वीरित्या राबवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. दत्तात्रेय म्हणाले की, संघाच्या शाखेत येणारे नागरिक संपूर्ण भारताचा विचार करतात. ते राज्य, प्रदेश, जाती किंवा समुदायापेक्षा वर उठून संपूर्ण राष्ट्राच्या दृष्टिकोनातून पाहतात. शाखेची गुणवत्ता वाढवणे आणि टिकवणे ही संघाची प्रमुख भूमिका आहे. वसाहती मानसिकता दूर करणे ही संघाची प्राथमिकता आहे. समाजात सज्जन शक्तींना एकत्र आणण्याचा प्रयत्न संघ सातत्याने करत आहे.
देशात अनेक ठिकाणी विशेष कार्यक्रम
शताब्दी वर्षानिमित्त राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत बोलताना होसबोले यांनी सांगितले की, शताब्दी वर्ष गृह संपर्क मोहीम राबवण्यात येत आहे. युवांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. अंदमानच्या नऊ टापूंमध्ये १३ हजार लोक सरसंघचालकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. अरुणाचल प्रदेशात आतापर्यंत ३७ हजार लोक विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. गुरू तेग बहादूर जी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभर २,१३४ विशेष कार्यक्रम झाले, ज्यात सुमारे सात लाख लोक सहभागी झाले.
कार्य विस्तार अधिक प्रभावी करण्यासाठी विकेंद्रीकरणाची संकल्पना राबवण्यात येत आहे. सध्याच्या ४५ प्रांतांऐवजी भविष्यात ८० पेक्षा अधिक संभाग कार्यरत होतील. हा बदल शताब्दी वर्षानंतर लागू केला जाईल. पुढील प्रतिनिधी सभेपर्यंत सध्याची व्यवस्था कायम राहील. संघाने गोबर आणि गोमूत्राचा वापर करून छतावरील नैसर्गिक शेती व हरितगृह प्रकल्प सुरू केल्याचीही दत्तात्रेय होसबोले यांनी माहिती दिली.