तिहार जेलमधून बाहेर पडताच अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्यांना आता…”

"माझे मनोबल शंभर पटीने वाढले आहे. माझी ताकद शंभरपटीने वाढली आहे. त्यांच्या तुरुंगाच्या मोठमोठ्या भिंती आणि ते जेल केजरीवालला कमकुवत करु शकत नाही", असेही अरविंद केजरीवाल यांनी म्हटले.

तिहार जेलमधून बाहेर पडताच अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, त्यांना आता...
| Updated on: Sep 13, 2024 | 8:09 PM

Arvind Kejriwal First Reaction : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. कथित दिल्ली दारू घोटाळाप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर तब्बल १७७ दिवसांनंतर अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. नुकतंच अरविंद केजरीवाल यांची तिहार जेलमधून सुटका करण्यात आली. तुरुंगाबाहेर येताच अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली. “तुरुंगातून बाहेर आल्यानंतर माझे मनोबल १०० पटीने वाढले. देशाची विभागणी करणाऱ्या आणि कमजोर करणाऱ्या राष्ट्रविरोधी शक्तींशी मी यापुढेही लढत राहणार आहे”, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले.

“मी मनापासून आभार मानतो”

“मी आज तुमच्या कृपा- आशीर्वादामुळे बाहेर आलो आहे. मी लाखो कोट्यावधी लोकांचे आभार मानतो. लाखो लोकांनी माझ्यासाठी नवस केला, प्रार्थना केली, दुआ मागितल्या. मला आशीर्वादही दिले. अनेक लोक मंदिर, मस्जिद, गुरुद्वारांमध्ये गेले. मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आज इतक्या पावसातही प्रचंड मोठ्या संख्येने इथे जमलेल्या सर्वांचेही मी मनापासून आभार मानतो”, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

“मी माझे आयुष्य देशासाठी समर्पित केले आहे. माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण, माझ्या शरीराचा प्रत्येक भाग, रक्ताचा प्रत्येक थेंब हा मी देशासाठी समर्पित केला आहे. मी आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. खूप मोठे-मोठे संघर्ष पाहिले आहेत. त्यांच्याशी लढलो आहे. आयुष्यात अडचणी सहन केल्या आहेत. पण प्रत्येक पावलांवर देवाने मला साथ दिली आहे. परमेश्वर कायम माझ्यासोबत असायचा. कारण मी खरा होतो आणि बरोबर होतो. या लोकांनी मला तुरुंगात टाकले. या लोकांना वाटले की केजरीवालला तुरुंगात टाकल्यास माझे मनधैर्य खचून जाईल. पण आता मी तुरुंगातून बाहेर आलो आहे. माझे मनोबल शंभर पटीने वाढले आहे. माझी ताकद शंभरपटीने वाढली आहे. त्यांच्या तुरुंगाच्या मोठमोठ्या भिंती आणि ते जेल केजरीवालला कमकुवत करु शकत नाही”, असेही अरविंद केजरीवाल यांनी म्हटले.

भविष्यातही लढत राहीन

“मी देवाला प्रार्थना करतो की ज्याप्रमाणे देवाने मला आतापर्यंत मार्ग दाखवला आणि शक्ती दिली, तसाच देव कायम माझ्या पाठीशी राहू दे. मी देशाची सेवा करत राहणार. देशाचा विकास रोखण्यासाठी कितीतरी देशद्रोही शक्ती काम करत आहेत. ते देशाचे विभाजन करण्याचे काम करत आहेत. देशाला आतून कमकुवत करणाऱ्यांविरुद्ध मी आयुष्यभर लढलो आहे आणि यापुढे भविष्यातही लढत राहीन”, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले.