balen shah : बालेन शाहा देणार पंतप्रधानपदाचा राजीनामा? नेपाळ पुन्हा पेटलं, जेन झी रस्त्यावर, भारताचं कनेक्शन समोर
नेपाळमधून मोठी बातमी समोर येत आहे. नेपाळमध्ये पुन्हा एकदा जेन झी रस्त्यावर उतरली आहे. बालेन शाहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता सुरू झाली आहे. भारताबद्दलचं एक वक्तव्य त्यांना चांगलंच भोवलं आहे.

नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वी जेन झीचं मोठं आंदोलन झालं होतं. या आंदोनामुळे देशात सत्तापालट झाला. त्यानंतर मार्च महिन्यात नेपाळमध्ये पुन्हा एकदा निवडणुका झाल्या आणि बालेन शाहा यांच्या पक्षाला बहुमत मिळालं, बालेन शाहा हे नेपाळचे पंतप्रधान झाले. दरम्यान बालेन शाहा यांनी पंतप्रधान होताच एका मागून एक भारतविरोधी निर्णय घेण्याचा धडाकाच लावला होता. आधी नेपाळ भारतामधून ज्या वस्तू आयात करतो त्यावर कर लावला, त्यानंतर भारतामधून नेपाळमध्ये येणाऱ्या वाहन पॉलिसीमध्ये बदल केला. वाहनांवर प्रचंड टोल लावला. त्यानंतर लिपूलेखवर देखील दावा केला. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी सीमा वादात लक्ष घालावेत अशी देखील त्यांनी विनंती केली. मात्र याच बालेन शाहा यांना आता नेपाळमध्ये मोठा धक्का बसला आहे. त्यांचं पंतप्रधानपद धोक्यात आलं आहे. नेपाळमधून मोठी बातमी समोर आली आहे.
बालेन शाहा यांना पंतप्रधान बनवण्यात तेथील जेन झीची फार मोठी भूमिका होती. मात्र बालेन शाहा यांच्या एका विधानामुळे पुन्हा एकदा हीच जेन झी आक्रमक बनली आहे. नेपाळमध्ये बालेन शाहांविरोधात जेन झी रस्त्यावर उतरले आहेत. नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूमध्ये तरुणांनी मशाल मोर्चा काढला आहे. बालेन शाहा यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जेन झी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. बालेन शाहा यांचं हे विधान राष्ट्रविरोधी असल्याचं मत येथील तरुणांनी व्यक्त केलं आहे.
असं काय म्हणाले बालेन शाहा?
बालेन शाहा हे पंतप्रधान झाल्यानंतर गेल्या आठवड्यात पहिल्यांदाच संसदेमध्ये त्यांचं भाषण झालं होतं. नेपाळचं परराष्ट्र धोरण स्पष्ट करताना त्यांनी भारताबद्दल मोठं विधान केलं होतं. त्यांनी लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा सीमीसंदर्भात बोलताना मोठं विधान केलं होतं, भारताने नेपाळच्या जमिनीवर ताबा मिळवला आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. तर दुसरीकडे ते असंही म्हणाले होते की मी पंतप्रधान झाल्यानंतर मला असं देखील कळालं आहे की, ज्या प्रमाणे भारताने नेपाळच्या काही जमिनीवर ताबा मिळवला आहे, त्याच प्रमाणे नेपाळचा देखील भारताच्या काही जमिनीवर ताबा आहे. पंतप्रधान बालेन शाहा यांच्या या वक्तव्यानंतर आता नेपाळमध्ये जेन झी आक्रमक झाली असून, आंदोलन चांगलंच पेटलं आहे.
