गंगा नदीत वाहणाऱ्या मृतदेहांवर कविता लिहिली, गुजरात साहित्य परिषदेने कवयित्रीला ठरवलं ‘नक्षली’

गंगा नदीतील वाहत्या मृतदेहांवर केलेल्या कवितेवरुन गुजरात साहित्य परिषदेने कवयित्री पारुल खाखर यांना थेट नक्षली ठरवलंय.

गंगा नदीत वाहणाऱ्या मृतदेहांवर कविता लिहिली, गुजरात साहित्य परिषदेने कवयित्रीला ठरवलं 'नक्षली'
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 1:32 AM

गांधीनगर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंगा नदीत अनेक मृतदेह वाहताना पाहून देशभरात खळबळ उडाली. मृतदेहांची अशी अवस्था पाहून अनेकजण हळहळले, तर अनेकांनी सरकारवर नियोजन शून्यतेचा आरोप करत टीकास्त्रही डागलं. याच घटनेवर गुजरातच्या कवयित्री पारुल खक्कर (Gujrati Poet Parul Khakhar) यांनीही कविता केली आणि काही दिवसातच ती देशभरात गाजली. अनेक भाषांमध्ये या कवितेचं भाषांतरही झालं, मात्र याच कवितेवरुन गुजरात साहित्य परिषदेने या कवयित्रींना थेट नक्षली ठरवलंय. त्यामुळे गुजरातमध्ये एकच गदारोळ पाहायला मिळालाय. व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवल्यानं कवयित्री नक्षली कशा? असाही संतप्त सवाल साहित्य क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे (Gujrat literature academy naxal remark over poem on dead bodies in ganga river).

“या शब्दांचा वापर कवितेला शोभत नाही”

गुजरातच्या साहित्य परिषदेने गंगा नदीतील वाहणाऱ्या मृतदेहांवरुन सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या कवयित्रींना नक्षली म्हटल्यानं नवा वाद तयार झालाय. साहित्य परिषदेने असं म्हणताना कवयित्रींवर अराजकता पसरवण्याचा आरोप केलाय. परिषदेने आपल्या ‘शब्दसृष्टी’ या नियतकालिकाच्या संपादकीयमध्ये म्हटलंय, “या कवितेत ज्या प्रकारच्या शब्दांचा वापर करण्यात आलाय तो कवितेला शोभत नाही. अशाप्रकारची विचारसरणी केवळ केंद्र सरकारच्या विरोधी विचारसरणीत आहे. हा विचार नक्षली साहित्यिकांचा आहे.”

गुजरात साहित्य परिषद एवढ्यावरच थांबली नाही, तर त्यांनी या कवितेला कविता मानण्यासच नकार दिला. “ही कविता नसून अराजकता पसरवण्याचा प्रकार आहे. ही कविता कोणत्याच दृष्टीकोनातून कविता नाहीये. हा केवळ विनाकामाचा आक्रोश आहे,” असा आरोप  केला. तसेच कवितेतील मतांशी सहमत नसल्याचंही म्हटलंय.

“पारुल यांच्या कवितेवर प्रश्न उपस्थित करणं बालिशपणा”

महाराष्ट्रातील कवी संतोष पवार यांनी गुजरात साहित्य अकादमीच्या या आरोपांचा चांगलाच समाचार घेतलाय. ते म्हणाले, “गुजरात साहित्य अकादमीच्या ‘शब्दसृष्टी’ या नियतकालिकामध्ये अकादमीचे अध्यक्ष विष्णु पांड्या यांनी संपादकीयमध्ये पारुल खक्कर या कवयित्रीला नक्षलवादी, अराजकतावादी ठरवलं आहे. ‘त्या ‘ कवितेला – कवितेचं ‘राजा, तमारा रामराज्यमा शववाहिनी गंगा’ हे शीर्षक मात्र त्यातून पूर्णपणे वगळून टाकले आहे. ही कविता तरी आहे का असा बालिश प्रश्न तिथे उपस्थित केला आहे.”

“परिषदेच्या अध्यक्षांकडून आधी उगवत्या ताऱ्याची उपमा, आता त्याच ताऱ्यावर थुंकण्याचा प्रकार”

“खरा लिहिता लेखक हा सत्याचीच बाजू घेतो. उन्मादात बुडालेल्या गुजरातमधून आलेला पारूल यांचा आवाज खतरनाक होता. आता तो तिथल्या मोदी शहा या रंगा-बिल्ला चमचांना बोचतो आहे. अकादमीचे अध्यक्ष दुतोंडी असून त्यांचा जाहीर निषेध आहे. याच अध्यक्ष पांड्या यांनी पारूल या गुजरात साहित्याचा उगवता तारा आहे म्हटले होते. तो उगवला तर हे त्या ताऱ्यावर थुंकायला निघाले आहेत. अखिल भारतातील लेखक पारूल यांच्या पाठीशी उभे राहतील. पारूल यांना गुजरातमध्ये काही अडचण असेल तर त्यांचे महाराष्ट्रात पुनर्वसन करण्याची मोहीम राबविण्यात येईल,” असंही मत संतोष पवार यांनी व्यक्त केलं.

“ही कविता आत्यंतिक सश्रद्ध स्त्रीची अगदी आतून आलेली सच्ची भावना”

ज्येष्ठ साहित्यिक कवयित्री प्रज्ञा पवार यांनीही या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया दिलीय. त्या म्हणाल्या, “मुळात पारुल यांनी त्यांच्या कवितेत माँ गंगा प्रेताने भरुभरुन वाहतेय याविषयी तीव्र विलाप व्यक्त केला आहे. ही कविता एका आत्यंतिक सश्रद्ध अशा स्त्रीची अगदी आतून आलेली सच्ची भावना आहे. आजपर्यंत श्रद्धेपोटी धार्मिक भजने लिहिणाऱ्या पारुलताई गंगेच्या या अपरुपाने अक्षरशः विद्ध झाल्या आहेत. ही कविता वाचताना त्यातल्या आक्रोशाने, वैयर्थतेने, राजा नग्न असल्याच्या आणि रंगाबिल्लाच्या धीट उल्लेखाने, त्यातल्या प्रखरतेने, तीव्र उपहासाने आपल्याला हलवून सोडते. खरं तर या कवयित्रीने आपल्यासमोर आरसा ठेवलाय. त्यात दिसणारी प्रतिमा प्रधानसेवकांना आणि त्यांच्या परममित्राला रुचणारी नाही हे तर उघडच आहे.”

“पांड्यासारखे सरकारी लेखनकामाठी गुजराती साहित्य परंपरेला काळिमा”

“करोना महामारीतल्या नियोजनाचा गलथानपणा, ढिसाळपणा, कोलमडून पडलेलं व्यवस्थापन, लाखो लोकांच्या मृत्यूची झाकपाक आणि अवघ्या देशाला आलेली स्मशानवत अवकळा, पैशांअभावी गंगेत सोडावी लागणारी प्रेतं, एखाद्या टिपकागदासारखा हा अवघा कल्लोळ टिपून घेणारी संवेदनशीलता आता अराज्यवादी, नक्षलवादी ठरवली गेली आहे. प्रधानसेवकाचे इमानी कुत्रे बनून स्वतःची जागा सेफ करणारे हे पांड्यासारखे सरकारी लेखनकामाठी करणारे म्हणजे अवघ्या गुजराती साहित्याच्या समृद्ध परंपरेला काळिमा फासणारे आहेत,” असा हल्लाबोल प्रज्ञा पवार यांनी केला.

“2002 मध्ये जेव्हा रातोरात वली दखनीची कबर भुईसपाट केली गेली आणि त्यावर गुळगुळीत डांबरी सडक बनवली गेली तेव्हा त्याची पाठराखण करणारे हेच साहित्यिक होते. एका अर्थाने या सरकारधार्जिण्या साहित्य व्यवहारावर पारुल खक्कर यांनी खणखणीत चपराक लगावली आहे. म्हणूनच सत्ताधाऱ्यांचे पाळीव साहित्यिक त्यांच्यावर आगपाखड करत आहेत. मी पारुल यांच्या निर्भयी अभिव्यक्तीला सलाम करते आणि त्यांना नक्षलवादी ठरवणाऱ्यांचा तीव्र निषेध करते. ‘वैष्णव जन तो तेने कहिये जे, पीड पराई जाणे रे’ म्हणणाऱ्या गुजरातच्या भूमीतला आजचा धीट, खणखणीत आवाज पारुल खक्करच्या रुपाने असाच गुंजत राहो,” असंही मत प्रज्ञा पवार यांनी व्यक्त केलं.

‘शववाहिनी बनली गंगा!’ या कवितेवरुन वाद

एका सूरात बोलले मुडदे,
छान छान सारं काही,
नाही कुठेही दंगा
राजा,तुझ्या रामराज्यात रे
शववाहिनी बनली गंगा
राजा,तुझी स्मशाने संपली
सरपणदेखील संपले रे
खांदे आमचे कमी पडती
कमी पडती रे रडणारे
घरोघरी यमाच्या टोळीचा
सुरूयं अवघा नाच नंगा
राजा, तुझ्या रामराज्यात रे
शववाहिनी बनली गंगा
नित्य निरंतर चिता जळती
जरा क्षणाची उसंत मागती
नित्य निरंतर फुटे बांगडी
धडधडीने फुटली छाती
ज्वाळा उंच उंच पाहताना
फिडल वाजवती बिल्ला रंगा
राजा,तुझ्या रामराज्यात रे
शववाहिनी बनली गंगा
दिव्य तुझी वस्त्रप्रावरणे
दिव्य तुझी रे कांती
कळले तुझे रूप खरे
जनता आहे जाणती
तू तर धोंडा,नाही मोती
आहे कुणी का मर्दगडी
जो म्हणू शकेल,
माझा राजा नंगा
राजा, तुझ्या रामराज्यात रे
शववाहिनी बनली गंगा
कवयित्री – पारुल खक्कर
मराठी अनुवाद – भरत यादव

हेही वाचा :

PHOTOS : उत्तर प्रदेशमधील हादरवून टाकणारी दृश्यं, मृतदेहांचा खच पाहून प्रत्येकजण सुन्न

सरकारच्या इशाऱ्यानंतरही गंगेच्या तीरावर मृतदेहांचं दफन सुरूच, प्रेतांची मोजदादही अशक्य

गंगा नदीत तरंगणारे मृतदेह नायजेरियाचे; कंगना रनौतचा जावईशोध

व्हिडीओ पाहा :

Gujrat literature academy naxal remark over poem on dead bodies in ganga river

Non Stop LIVE Update
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.