फाशीवर चढवा अथवा तुरूंगात पाठवा, पण… वंदेमातरम वादात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे काय बोलून गेले
Congress Leader BK Hariprasad : कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष बीके हरिप्रसाद यांनी संपूर्ण वंदेमातरम हे राष्ट्रीय गीत म्हणणार नाही असा सूर आळवला आहे. त्यांच्या भूमिकेने आता नवीन वाद उद्भवला आहे. काय म्हणाले हरिप्रसाद?

वंदे मातरम हे संपूर्ण राष्ट्रीय गीत गायनावरून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या वादाचा धुराळा खाली बसत नाही तोच, कर्नाटक काँग्रेसने नवीन वाद वाढवला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बीके हरिप्रसाद यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मला फासावर चढवा अथवा तुरूंगात पाठवा पण मी वंदेमातरम या राष्ट्रीय गीताचे केवळ दोनच कडवे म्हणणार अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. ते म्हणाले की कर्नाटकमध्ये केवळ दोनच कडव्यांचे वंदे मातरम गायले जाते. यावरून आता नवीन वाद उद्भवला आहे.
या 15 ऑगस्ट रोजी पहिल्यांदा राष्ट्रगीत जन गण मन पूर्वी राष्ट्रीय गीत वंदे मातरम गायले गेले. संपूर्ण वंदे मातरम गाण्याचे निर्देश नुकतेच केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहे. सहा कडव्यांचे वंदे मातरम गीत म्हणणे अनिवार्य करण्यात आले आहे. यापू्र्वी दोन कडवे गायिले जात. संपूर्ण वंदे मातरम गायिले जावे यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. तर काँग्रेस दोन कडव्यांसाठी आग्रही असल्याचे समोर आले आहे. सोनिया गांधी यांच्याविरोधात अनेक ठिकाणी तक्रार नोंदवण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्य दिनी सोनिया गांधी यांनी संपूर्ण वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हटले नसल्याचा दावा भाजपने केला आहे. त्यावरून त्यांनी टीका केली. तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गोव्यातील बैठकीविषयी सुद्धा वाद उफाळला आहे. अर्थात काँग्रेसने हे सर्व दावे फेटाळले आहेत. आता बीके हरिप्रसाद यांच्या वक्तव्याने वाद उफाळला आहे.
खर्गे यांचा भाजपवर निशाणा
या घटनेनंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे .महात्मा गांधी, जवाहर लाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी आणि ज्या लोकांनी 12 वर्षांपासून वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे केवळ दोनच कडवे गायले आहे. या सर्वांविरोधात तक्रार द्यायला हवी. केस दाखल करायची असेल तर महात्मा गांधी, अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरही करा. जर आम्ही गुन्हेगार असू तर मग महात्मा गांधी हे सुद्धा गुन्हेगार आहेत. जर हाच गुन्हा असेल तर मग वल्लभभाई पटेल यांच्यावर सुद्धा केस टाका, असे खर्गे म्हणाले.
त्यांना याची कल्पना नाही की, त्यांच्या जन्माआधीच काँग्रेसने देशासाठी कोणती राष्ट्रीय गीते स्वीकारली जावीत, याविषयीचा एक ठराव मंजूर केला होता. तुम्ही म्हणाल, ती गोष्ट राष्ट्रीय प्रमाण आणि नियम बनेल असे होत नाही. उद्या कदाचित दुसरे एखादे सरकार सत्तेवर येईल. त्यांनी काही सांगितले तर तोच नियम मानला जाईल का? आम्ही केवळ 90 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा पुढे चालवत आहोत, असा टोला खर्गे यांनी भाजपला लगावला.
लालकिल्ल्यावर यंदा स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण वंदे मातरम गीत गायले. मोदी सरकारने वंदे मातरम गीताविषयी पहिल्यांदाच कायदा आणला आहे. जर एखादा व्यक्ती मुद्दामहून वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अवमान, अपमान करत असेल तर त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.