आधी हवाई पाहणी, नंतर पूरग्रस्तांना भेटून दिला धीर, पंतप्रधान मोदींकडून 1500 कोटींच्या पॅकेजची घोषणा

हिमाचल प्रदेशातल्या भीषण पूरपरिस्थितीची हवाई पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1500 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली. त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. या पॅकेजमध्ये SDRF, किसान सन्मान निधीचा अॅडव्हान्स हप्ता आणि पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरांची तरतूद समाविष्ट आहे.

आधी हवाई पाहणी, नंतर पूरग्रस्तांना भेटून दिला धीर, पंतप्रधान मोदींकडून 1500 कोटींच्या पॅकेजची घोषणा
pm narendra modi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 09, 2025 | 5:58 PM

हिमाचल प्रदेशात अक्षरश: ढगफुटी झाली आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि मंडी या दोन भागात तर मोठ्या प्रमाणावर महापूर आला आहे. त्यामुळे या ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी आज हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) मंडी आणि कुल्लू या दोन्ही पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी (aerial survey) केली. या भागातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या व्यथा समजून घेतल्या आणि त्यांना धीरही दिला. त्यानंतर मोदींनी पूरग्रस्त हिमाचल प्रदेशासाठी 1500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आहे. तशी घोषणाच मोदींनी केली आहे.

हिमाचल प्रदेशात सलग पाऊस पडत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूर आला आहे. काही ठिकाणी तर दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. अनेक ठिकाणी भूस्खलनही झालं आहे. त्यामुळे अनेकांना विस्थापित व्हावं लागलं आहे. हजारो लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पूरग्रस्त भागाचा दौरा करत येथील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या हवाई पाहणीनंतर त्यांनी ट्विटरवर एक पोस्टही केली आहे.

हिमाचल प्रदेशातील पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मी हवाई सर्व्हेक्षण केलं आहे. या कठिण काळात आपण समर्थपणे उभे आहोत. पूरग्रस्तांना निरंतर मदत देण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत, असं मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

योजनेचा हप्ता आधीच मिळणार

हिमाचल प्रदेशासाठी 1500 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याबरोबरच केंद्र सरकार एसडीआरएफ आणि पंतप्रधान किसान सन्मान निधीचा दुसरा हप्ता अॅडव्हान्समध्ये देणार आहे. राज्यातील संपूर्ण नागरिकांचं जनजीवन पुन्हा रुळावर आणण्यासाठी बहुआयामी दृष्टीकोण अवलंबण्याची गरज असल्याचं आवाहनही मोदींनी केलं आहे.

पीएम आवासमधून घरे

भूस्खलन आणि पूरामुळे ज्यांच्या घरांचे नुकसान झालं आहे. त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय राजमार्गांची डागडुजी केली जाणार आहे. शाळांची नव्याने उभारणी करण्यात येणार आहे. तसेच पूरग्रस्तांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती मदत निधीतून आर्थिक मदत केली जाणार आहे. पशुधन घेण्यासाठी मिनी किट दिलं जाणार आहे.

ज्यांच्याकडे आता वीज कनेक्शन नाहीये, त्यांना अतिरिक्त मदत दिली जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत क्षतिग्रस्त घरांची जिओटॅगिंक केली जाणार आहे. त्यामुळे नुकसानीची अचूक माहिती मिळणार आहे. तसेच आपत्तीग्रस्तांना वेळेवर आणि तातडीने मदत देता येणार आहे.

 

मुलांना कोणत्याही अडचणी शिवाय शिक्षण मिळावं म्हणून शाळेच्या नुकसानीची माहिती मागवली जाणार आहे. तसेच शाळांनाही जिओ टॅगिंक करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळांनाही मदत वेळेत पोहोचवली जाणार आहे. केंद्र सरकारने नुकसानीचा आढावा घेण्यासाठी विविध मंत्रालयाची एक टीम हिमाचल प्रदेशात पाठवली आहे. या टीमने दिलेल्या विस्तृत रिपोर्टच्या आधारे केंद्र सरकार हिमाचल प्रदेशात पुढील मदत करण्याचा विचार करणार आहे.

370 नागरिकांना मृत्यू

हिमाचल प्रदेशात 20 जून पासून 8 सप्टेंबरपर्यंत ढगफूटी, फ्लॅश फल्ड आणि दरड कोसळल्यामुळे 4122 कोटींचं नुकसान झालं आहे. स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आणि स्टेट एमर्जन्सी ऑपरेशन सेंटरच्या अनुसार, राज्यात आतापर्यंत 370 हून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. तर 205 लोकांचा मृत्यू पावसामुळे झाला आहे. यात भुस्खलनात 43, ढगफूटीत 17 आणि फ्लॅश फ्लडमध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला आहे.

या डोंगराळ राज्यात 165 नागरिकांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला आहे. त्याशिवाय 41 लोक अजूनही बेपत्ता आहेत. प्रचंड पावसामुळे हिमाचल प्रदेशातील पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं आहे. या पावसामुळे
6,344 घरे, 461 दुकानें आणि व्यापारी प्रतिष्ठानांचं नुकसान झालं आहे.