Family Dispute | पती अपघातात गेला, सासू-सासऱ्यांनीच सुनेचं दुसरं लग्न लावलं आणि आता कोर्टातही खेचलं!

| Updated on: Dec 16, 2021 | 11:33 AM

दिलेलं वचन विसरल्यानं रक्ताची नाती कोर्टाची पायरी चढण्यासाठी भाग पडल्याची घटना समोर आली आहे. नातलगांबाबत दिलेल्या वचनावरुन झालेल्या वाद ताणला गेल्यानंतर अखेर कोर्टासमोर यावं लागण्याची वेळ एका कुटुंबावर ओढावली आहे.

Family Dispute | पती अपघातात गेला, सासू-सासऱ्यांनीच सुनेचं दुसरं लग्न लावलं आणि आता कोर्टातही खेचलं!
Follow us on

ब्युरो : आजी-आजोबांसाठी त्यांची नातवंड ही आपल्या पोटच्या मुलापेक्षाही जास्त जवळची असतात. नातवंडांचे लाड करायला कोणत्या आजी-आजोबांना आवडणार नाही? पण जर हे लाड करायला मिळाले नाहीत, तर मग आजी-आजोबांनी काय करायचं? कुणाकडे दाद मागायची? यासारखे अनेक प्रश्न अनेक आजी-आजोबांना पडले असतील. त्यातही मुलाच्या मृत्यूनंतर आई-वडील आपल्या मुलाला आपल्या नातवंडांमध्ये (Grand Kids) शोधत असतात. पण त्याच मुलाच्या विधवा पत्नीचा विचार करणारेही काही थोडे आई-वडील आजही या समाजात आहेत.

विधवा सुनेचं (Widow Daughter-in-law) लग्न झाल्याच्या चांगल्या बातम्या फार कमी वेळा ऐकायला येतात. अशीच एक चांगली गोष्ट एका कुटुंबानं केली खरी. पण काळी काळानंतर या कुटुंबामध्ये कलह झाला. या कलहाचं कारण होतं मृत्यू झालेल्या मुलापासून झालेल्या दोन मुलांची कस्टडी! हा सगळा वाद इतका ताणला गेलाय, की मृत्यूनंतर आपल्याच सुनेचं दुसरं लग्न लावून दिलेल्या सासू-सासऱ्यांनी कोर्टाची (Court) पायरी चढलेत.

काय आहे प्रकरण?

मुलाच्या मृत्यूनंतर सासू-सासऱ्यांनी एका धाडसी निर्णय घेतला. आपल्या सुनेचं दुसरं लग्न लावायचं त्यांनी ठरवलं. लावूनही दिलं. पण लग्न लावण्याआधी मुलापासून झालेल्या नातवाला आणि नातीला आजी-आजोबांकडे ठेवायचं वचन सासू-सासऱ्यांनी सुनेकडून घेतलं होतं. मृत्यू झालेल्या मुलाकडून एक 7 आणि 8 वर्षांचं नातवंड मुलाची निशाणी म्हणून आपल्याकडे सांभाळायला द्यावी, अशी अट सासू-सासऱ्यांनी सुनेला घातली होती. ही अट सुरुवातीला सुनेनं मान्यही केली. मग लग्न झालं. पण दुसऱ्या लग्नानंतर सुनेनं या अटीला केराची टोपली दाखवली. इथूनच वादाची ठिणगी पडली.

म्हणून कोर्टाची पायरी चढले…

दुसरं लग्न झाल्यानंर सुनेनं आपल्या नातवंडांना आपल्या आजी-आजोबांपासून दूर तर केलंच! शिवाय आपल्या मुलांना आपल्या आई-वडिलांकडे सोपवलं. या वादाचा कहर इतका झाला, की सुनेनं नातवंड आणि आजी-आजोबांची भेटही होऊ दिली नाही. आपल्या मुलाची शेवटची निशाणी असलेल्या नातवंडांची ताटातूट झाल्यानं व्याकूळ झालेल्या आजी-आजोबांना दुःख सहन नाही झालं. अखेर कायदेशीर पर्यायाशिवाय काहीच उपाय नसल्यानं आजी-आजोबांनी अखेर कोर्टाची मदत घ्यायचं नक्की केलं.

कुणी केली मदत?

भाई वेलफेअर सोसायटीच्या (BHAI Welfare Society) मदतीनं आजी-आजोबांनी कायदेशीर मदत घ्यायचं ठरवलं. भाई वेलफेअर सोसायटीचे फाऊंडर मेंबर जकी अहमद यांनी एका वृ्त्तपत्राला दिलेल्या माहितीत म्हटलंय की,

एका वृद्ध दाम्पत्याच्या मुलाचा एका रस्ते अपघातात (Road Accident) मृत्यू झला होता. 2016मध्ये झालेल्या मुलाच्या अपघातानं त्याची तरुण पत्नी एकाकी पडली होती. तिच्यासमोर तिचं अख्खं आयुष्य होतं. ही बाब ध्यानात घेऊन 2019मध्ये त्यांनी आपल्या विधवा सुनेला दुसरं लग्न करण्यास परवानगी दिली. इतकंच काय तर नातवंडांची जबाबदारी घेण्याचंही मान्य केलं. पण 2019मध्ये दुसरं लग्न झाल्यानंतर सुनेनं आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली. तिची अशी इच्छा होती की सासू-सासऱ्यांनी दर महिना 20 हजार रुपये मुलांच्या संगोपनासाठी देत राहावेत.

नातवंडांशी ताटातूट

या सगळ्या वादविवादावर तोडगा निघावा यासाठी जकी अहमद (Jaki Ahamad) यांनी सुनेलाही काऊंसिलिंगसाठी (counselling) बोलावलं होतं. पण तिनं काऊन्सिलिंगला येण्यास स्पष्टपणे नकार दिला. इतकंच काय तर, ज्या सासू-सासऱ्यांना तिला दुसऱ्या लग्नाची परवानगी दिली होती, त्यांच्यावरही विश्वास नसल्याचं म्हणत नातवंडांशी त्यांची ताटातूट केली. आई-वडीलच मुलांना सांभाळतील, असंही सुनेनं म्हटल्याचं जकी यांनी सांगितलंय.

रक्ताची नाती कोर्टात एकमेकांसमोर!

आता या संपूर्ण प्रकरणी कोर्टात काय सुनावणी होते, हे पाहणं महत्त्वाचंय. दरम्यान, आता नातवंड सुनेच्या आई-वडिलांकडे राहत आहेत. त्यांच्याकडे कमाईचं कोणतंही साधन नाही. अशात सासू-सासरे जे पैसे नातवंडांच्या संगोपनासाठी देत होते, त्यातच सुनेचे आई-वडीलही आपला संसार रेटत होते, असाही आरोप केला जातो आहे. त्यामुळे आपल्या नातवंडांची कस्टडी आपल्याला मिळावी आणि आपल्या मुलाची निशाणी आपल्याकडे राहावी, या इच्छेनं वृद्ध दाम्पत्प आपल्या सुनेविरोधात कोर्टाची पायरी चढलेत. आता या कायदेशीर लढाईत आजी-आजोबांची आपल्या नातवंडांसोबत झालेली ताटातूट कायमची संपते की तशीच राहते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भोपाळमधून समोर आलेल्या या घटनेनं अनेक सवालही उपस्थित केले आहेत.

मुलांच्या कस्टडीसाठीच्या खटल्यात वाढ?

मुलांच्या कस्टडीसाठी कोर्टात खटले दाखल होण्याची आकडेवारीही चिंताजनक मानली जातेय. गेल्या 3 वर्षात 267 पुरुषांनी गेल्या 3 वर्षात 267 पुरुषांनी मुलांच्या कस्टडीसाठी खटले दाखल केलेत. तर एकट्या मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) तब्बल 980 मुलांच्या कस्टडीची (custody) प्रकरणं प्रलंबित आहेत. यातील 90 टक्के प्रकरणं ही पुरुषांनी मुलांच्या कस्टडीसाठी कायदेशील लढा सुरु ठेवल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे 3 पुरुषांनी तर सिद्धही केलंय की वडील हे आईपेक्षा जास्त संवेदनशील असून वडील मुलांची जास्त चांगली काळजी घेऊ शकतात. तर दुसरीकडे आजी-आजोबांनी नातवंडांच्या कस्टडीसाठी केस करण्याची भोपाळमधली (Bhopal) ही तिसरी घटना आहे.

संबंधित बातम्या –

Marriage Age Of Women: आता 18 व्या नव्हे, 21 व्या वर्षी वाजवा रे वाजवा!, मुलीच्या लग्नाचे वय वाढवले; प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी

आजी-आजोबांची आठवण आली आणि ‘ती’ लोकलमध्ये बसली, पोलिसांच्या सतर्कतेमुळे सात वर्षाच्या चिमुरडीचा शोध

नातवानं नाव काढलं, आजी आजोबांना हेलिकॉप्टर सफर, गावातून जंगी मिरवणूक