CJI Suryakant : सरन्यायाधीश सूर्यकांत यांना प्रचंड विरोध, विद्यार्थी भडकले, प्रमुख पाहुणे नको म्हणत थेट पत्र!
वकांना कॉकरोच म्हणणाऱ्या तसेच पोलिसांच्या हिंसाचाराला पाहण्यास आमच्याकडे वेळ नाही म्हणणाऱ्या सीजेआय सूर्यकांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. सीजेआय यांनी विद्यार्थ्यांप्रती एका प्रकारची उदासीनताच दाखवलेली आहे, असे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.

CJI Suryakant : सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणांचा कॉकरोच असा उल्लेख केल्यानंतर देशात कॉकरोच जनता पार्टी नवाचे आंदोलन उभे राहिले. याच आंदोलनामुळे नंतर धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता कॉकरोच जनता पार्टी देशभरात काम करणार आहे. दरम्यान, सरन्यायाधीशांनी कॉकरोचचा उल्लेख केल्यापासून ते चर्चेत आहेत. दिल्लीच्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, असे सांगत पोलिसांच्या कारवाईवर तत्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. दरम्यान, आता हेच सरन्यायाधीश एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. हैदरबादमधील NALSAR विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या हातातून पदवी स्वीकारण्यास नकार दिला आहे. विद्यार्थ्यांनी दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमालाच विरोध केला आहे.
विद्यापीठाने प्रमुख पाहण्यांबाबत पुनर्विचार करावा
हैदराबाद येथील नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडिज अँड रिसर्च (NALSAR) विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभावरून मोठा वाद सुरू झाला आहे. या दीक्षांत समारंभाला सरन्यायाधीश सूर्यकांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. सरन्यायाधीशांच्याच हस्ते विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येणार आहे. परंतु 2026 साली पदवी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने सूर्यकांत यांच्या हस्ते पदवी घेण्यास नकार दिला आहे. या विद्यार्थ्यांनी कुलगुरू, कुलसचिव तसेच प्राध्यापकांना एक पत्र लिहिले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हस्ते पदावी प्रदान करण्याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आलीये. या पत्रात देशात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांना प्रमुख पाहुणे आमंत्रित करण्याचा निर्णय संवैधानिक जबाबदारी आणि शैक्षणिक स्वातंत्र्याच्या मूल्यांविरोधात आहे, असेही मत या पत्रात व्यक्त करण्यात आले आहे.
पत्रात नेमके काय मत मांडण्यात आले?
युवकांना कॉकरोच म्हणणाऱ्या तसेच पोलिसांच्या हिंसाचाराला पाहण्यास आमच्याकडे वेळ नाही म्हणणाऱ्या सीजेआय सूर्यकांत यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. सीजेआय यांनी विद्यार्थ्यांप्रती एका प्रकारची उदासीनताच दाखवलेली आहे. अशा स्थितीत सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हस्ते पदवी घेणे हे आम्हाला योग्य वाटत नाहीये, असे मत विद्यार्थ्यांनी या पत्रात व्यक्त केले आहे. दरम्यान, आता विद्यार्थ्यांच्या या मागणीवर विद्यापीठ प्रशासनाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.