Balen Shah : नेपाळचा गेम ओव्हर, अखेर बालेन शाह भारतासमोर झुकले, घेतला मोठा निर्णय

सत्तेत आल्यापासून नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा कायमच भारतविरोधी सुरू राहिला आहे. मात्र भारताने कोंडी केल्यानंतर आता बालेन शाह माघार घेताना दिसत आहेत. नेपाळ सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Balen Shah : नेपाळचा गेम ओव्हर, अखेर बालेन शाह भारतासमोर झुकले, घेतला मोठा निर्णय
Balen Shah
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 11, 2026 | 3:09 PM

काही महिन्यांपूर्वी नेपाळमध्ये जेन झीचं मोठं आंदोलन झालं होतं. या आंदोलनानंतर नेपाळमधील सरकार कोसळलं आणि नव्या सरकारची स्थापना झाली. बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. सत्तेत येताच बालेन शाह यांचा भारतविरोधी सूर दिसून आला. पंतप्रधानपदाची शपथ घेताच बालेन शाह यांनी भारतामधून नेपाळमध्ये निर्यात होणाऱ्या मालावर कर लावण्याचा निर्णय घेतला. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी भारतामधून नेपाळमध्ये जाणाऱ्या वाहनांवर देखील प्रचंड टोल लावला होता, तसेच या वाहनांना अस्थायी वाहन नोंदणी करणं सक्तीचं केलं होतं. ही प्रक्रिया अत्यंत किचकट होती. बालेन शाह यांनी लेपूलेखवर देखील दावा केला होता, त्यांनी या संदर्भात थेट ब्रिटनच्या पंतप्रधानांना पत्र लिहिल्याचं समोर आलं होतं. मात्र त्यानंतर भारताने नेपाळला दोन मोठे झटके दिले, ते म्हणजे नेपाळमधून भारतात निर्यात होणाऱ्या चहाच्या तपासणीचे निकष हे अत्यंत कडक केले त्यामुळे नेपाळचा चहा व्यवसाय ठप्प झाला. नेपाळमधील अनेक चहा कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली. तसेच पुढील तीन वर्ष कोणत्याही प्रकारची साखर नेपाळला निर्यात केली जाणार नाही, असा निर्णय भारताने घेतला आहे. त्यामुळे आता नेपाळमध्ये साखरेचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता बालेन शाह यांचे सूर बदलताना दिसत आहेत. त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

बालेन शाह सरकारने आता भारताच्या सीमेला लागून असलेले 18 बॉर्डर एंट्री पॉइंट पुन्हा एकदा सुरू केले आहेत. यामुळे दोन्ही देशाच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, तसेच भारतामधून नेपाळमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची देखील गैरसोय दूर झाली आहे. रिपोर्टनुसार नेपाळ सरकारने भिस्वा आणि ठेडी सह जवळपास 18 कस्टम पॉइंट पुन्हा एकदा सुरू केले आहेत. नेपाळ सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता कोणत्याही शुल्काशिवाय 9 किलोमीटरपर्यंत वाहनांना एन्ट्री मिळणार आहे, मात्र त्यापुढे जायचं झाल्यास या वाहनांना टोल भरावा लागणार आहे.

बालेन शाह यांच्या या नव्या निर्णयामुळे नेपाळच्या सीमेला लागू असलेल्या भारतीय प्रदेशातील नागरिक तसेच पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आता नेपाळमध्ये प्रवेश करणं हे सोपं झालं आहे, नेपाळच्या या नव्या निर्णयामुळे नेपाळच्या पर्यटक संख्येत देखील मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आता क्यूआर कोडच्या माध्यमातून कस्टम क्लियरंसची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पर्यटकांचा मोठा मनस्ताप टळला आहे. यापूर्वी भारतीय नागरिकांना जर नेपाळमध्ये प्रवेश करायचा असेल तर अनेक जाचक अटी ठेवण्यात आल्या होत्या.

Follow Us