Bhargavasta : पाकिस्तानच मनोबल तोडण्यासाठी भारत लवकरच बाहेर काढणार भार्गवास्त्र, 10 सेकंदात काम तमाम करणाऱ्या या अस्त्रात काय खास?
India Bhargavasta : भारतीय कंपन्यांनी स्वबळावर भार्गवास्त्र विकसित केलं आहे. अवघ्या 10 सेकंदात शत्रुचे इरादे हाणून पाडणाऱ्या या अस्त्रात खूप काही खास आहे. भार्गवास्त्र एका लेयर्ड हार्ड-किल इंटरसेप्शन आर्किटेक्चरवर काम करतं.

ड्रोन हल्ल्यापासून संरक्षण देणारं तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये भारत एका महत्वाच्या टप्प्यावर आहे. भारताच्या सोलर इंडस्ट्रीजने स्वदेशी भार्गवास्त्र विकसित केलं आहे. ही काऊंटर ड्रोन सिस्टिम आहे. भार्गवास्त्र चाचणीच्या अंतिम टप्प्यावर आहे. डिसेंबर 2026 पर्यंत सर्व चाचण्या पूर्ण होऊ शकतात. शत्रुने डागलेले ड्रोन्स, लॉयटरिंग म्युनिशन आणि खासकरुन स्वार्म ड्रोन हल्ला उद्धवस्त करण्यासाठी खास भार्गवास्त्र विकसित करण्यात आलं आहे. भार्गवास्त्र एका लेयर्ड हार्ड-किल इंटरसेप्शन आर्किटेक्चरवर काम करतं. यात एका सिंगल लॉन्चरमध्ये 64 मायक्रो-रॉकेट्स किंवा मिसाइल्स फिट करता येतात. संपूर्ण सॅल्वो म्हणजे सर्व शस्त्र एकाचवेळी 10 सेकंदात डागता येतात. ड्रोन स्वार्म हल्ल्याविरोधात ही टेक्नोलॉजी खूप प्रभावी आहे. ड्रोन स्वार्म म्हणजे ड्रोन्सच्या झुंडीने होणारा हल्ला. ही सिस्टिम मध्यम आणि मोठ्या यूएवीना (UAV) 10 किलोमीटर अंतरावर असताना आणि छोट्या ड्रोन्सना 6 किलोमीटर अंतरावर असतानाच डिटेक्ट करु शकते.
भार्गवास्त्रामध्ये दोन प्रकारची शस्त्र बसवलेली आहेत. स्वार्म ड्रोन्सचा हल्ला रोखण्यासाठी अनगायडेड मायक्रो-रॉकेट्सचा वापर केला जातो. ही रॉकेट्स मोठ्या क्षेत्राला कवर करतात. अचूक हल्ल्यासाठी गायडेड मायक्रो-मिसाइल्सचा वापर होतो. जे येणारं टार्गेट हवेतच उद्धवस्त करते. हिटू टू किल टेक्निकवर ही सिस्टिम काम करते. सिस्टिमला C4I नेटवर्कशी जोडलेलं आहे. यात EO/IR सेंसर आहेत. जे दिवस-रात्र कुठल्याही वातावरणात काम करण्यासाठी सक्षम आहेत.
काय लक्षात घेऊन भार्गवास्त्र बनवलय?
भारताची वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन भार्गवास्त्र डिझाईन करण्यात आलं आहे. वाळवंट, मैदानी प्रदेश आणि 5000 मीटर उंचीवरील पर्वतीय भागातही ही सिस्टिम काम करण्यास सक्षम आहे. सीमा सुरक्षा, महत्वाचे सैन्य तळ आणि रणनितीक ठिकाणांच्या सुरक्षेसाठी भार्गवास्त्र उत्तम आहे.
शत्रुचा हल्ला कसा रोखता येईल?
आजच्या युद्धात ड्रोन आणि स्वार्म ड्रोन हल्ला रोखणं एक मोठं आव्हान बनलं आहे. कुठलीही एअर डिफेन्स सिस्टिम 100 टक्के सुरक्षा देऊ शकत नाही.अशावेळी भार्गवास्त्र सिस्टिममुळे एक मोठं सुरक्षाकवच तयार होतं. महत्वपूर्ण क्षेत्रात चार ते सहा भार्गवास्त्र सिस्टिम तैनात करुन शत्रुचा हल्ला रोखता येऊ शकतो. त्यात अन्य एअर डिफेन्स सिस्टिमचा वापर करण्यात खर्च जास्त होऊ शकतो.
परदेशी टेक्नोलॉजीवरील अवलंबित्व कमी
भारताचं हे स्वदेशी अँटी ड्रोन शील्ड विकसित करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल आहे. म्हणजे ड्रोन हल्ल्यापासून सुरक्षा कवच. हे भार्गवास्त्र संपूर्णपणे स्वदेशी असून भारतीय कंपन्यांनी विकसित केलं आहे. त्यामुळे परदेशी टेक्नोलॉजीवरील अवलंबित्व कमी होईल. अंतिम चाचणीनंतर लगेचच याचा भारतीय सैन्यात समावेश होईल. त्यामुळे भारताची बचावात्मक सुरक्षा अजून अभेद्य होईल.
