कोण आहेत न्यामूर्ती बी.वी. नागरत्ना? भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होण्याचा मान मिळणार
भारताच्या सरन्यायाधीशपदी लवकरच महिला होण्याची शक्यता आहे. बी.व्ही. नागरत्ना या सरन्यायाधीश होऊ शकतात. त्यांच्याविषयी जाणून घ्या

भारतात सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश पद अद्याप कोणत्याही महिलेने भूषवलेले नाही. आता लवकरच भारताची 75 वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात येणार आहे. कारण सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश म्हणून बी.वी. नागरत्ना यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठता क्रमानुसार विक्रम नाथ यांच्यानंतर आता न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोण आहेत नागरत्ना?
बी. व्ही. नागरत्ना यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1962 रोजी बेंगळुरूमध्ये झाला. त्यांनी के जीसस अँड मेरी कॉलेजमध्ये बीएचे शिक्षण पूर्ण केलं. पुढे 1987 साली दिल्ली विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी 1987 साली वकिली सुरू केली. न्यायमूर्ती नागरत्ना यांचे वडील ई. एस. व्यंकटरमैया हे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होऊन गेले आहेत. त्यांनी 19 जून 1989 ते डिसेंबर 1989 या कालावधित सरन्यायाधीश पद भूषवलं. ते सुप्रीम कोर्टाचे 19वे सरन्यायाधीश ठरले. त्यांनी सरन्यायाधीश पद भूषवल्यास, त्या अशा व्यक्ती ठरतील, ज्यांचे वडील आणि स्वत: दोघांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश पद भूषवल्याचा इतिहास होईल.
सुप्रीम कोर्टाने आतापर्यंत सरन्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी ज्येष्ठतेवर आधारित परंपरेचं पालन केलं आहे. सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ न्यायाधीशांची पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली जाते. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटनुसार, आता न्यायमूर्ती सूर्यकांत, पुढे न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि मग न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना असा क्रम आहे. न्यायमूर्ती नागरत्ना या सप्टेंबर 2027 रोजी सरन्यायाधीश होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 29 ऑक्टोबर 2027 रोजी सेवानिवृत्त होण्याची शक्यता आहे. त्यांचा कार्यकाळ हा 36 दिवसांचा असू शकतो.
सुप्रीम कोर्टाची 1950 साली स्थापना झाली. तेव्हापासून भारताच्या सरन्यायाधीशपदी अद्याप एकही महिला विराजमान झालेली नाही. न्यायपालिकेत महिलांची संख्या वाढताना दिसत आहे. परंतु सुप्रीम कोर्टात महिलांचे प्रतिनिधित्व मर्यादितच राहिलं आहे. सुप्रीम कोर्टात 2026 साली न्यायमूर्ती नागरत्ना, न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे महिला न्यायमूर्तींची संख्या वाढल्याचे दिसून आले. परंतु सरन्यायाधीश पदापर्यंत एकही महिला पोहोचलेली नाही. परंतु आता सुप्रीम कोर्टात महिला सरन्यायाधीश देखील होण्याची शक्यता आहे.
