
भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने ६ मे रोजी ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानने ७ मे रोजी रात्री पाकिस्तानकडून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय सुरक्षा दलांनी तो हाणून पाडला. त्यानंतर ८ मे रोजी सकाळी भारताने पाकिस्तानातील १५ शहरांवर ड्रोन हल्ला करत चोख प्रत्यत्तुर दिले. यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती थांबताना दिसत नाही. पाकिस्तानकडून भारतातील 3 राज्यांमध्ये ड्रोन हल्ला करण्यामत आला. जम्मू, राजस्थान आणि पंजाबमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र भारताच्या सतर्क हवाई संरक्षण यंत्रणेमुळे ते परतवण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू शहरात रात्री ८ च्या दरम्यान स्फोटांचे आवाज ऐकू आला. त्यानंतर तातडीने हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवण्यात आले. यानंतर काही सेकंदातच संपूर्ण शहरात वीजपुरवठा खंडित करण्यात आला आणि अवघ्या काही क्षणात ब्लॅकआऊट झाला. स्फोटाचा आवाज झाल्यानंतर तातडीने S-400 सुदर्शन या एअर डिफेन्स यंत्रणा तात्काळ सक्रीय झाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, शहरात ५ ते ६ स्फोट ऐकू आले असून हा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जम्मूबरोबरच पाकिस्तानने पठाणकोट एअरबेसवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतानेही पाकचा हा प्रयत्न हाणून पाडला. पाकिस्तानच्या या सततच्या हल्ल्यामुळे खबरदारी म्हणून काश्मीर, पंजाबमधील अमृतसर शहरातही ब्लॅकआऊट करण्यात आला. हॉटेल्स आणि बाजारपेठेतील दिवे बंद ठेवण्यात आले आहेत. यानंतर शहरात एअर सायरन वाजवण्यात आले. नागरिकांना घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानचे एफ-16 फायटर जेटही खाली पाडले आहे.
#WATCH | Sirens being heard in Akhnoor, Jammu and Kashmir
More details awaited. pic.twitter.com/eiGdyj14Tq
— ANI (@ANI) May 8, 2025
पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. सीमेपलीकडून जम्मू-काश्मीरमधील नागरी वस्त्यांवर लक्ष्य साधले जात आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील बारामूला आणि कुपवाडा जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा तसेच श्रीनगर आणि अवंतीपोरा विमानतळाजवळील शाळा ९ आणि १० मे रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर एअर स्ट्राईक करून ते उद्ध्वस्त केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. यानंतर पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांमधील लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र याला भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर देत हवेतच उद्ध्वस्त केले. यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार सिस्टीम ड्रोन हल्ल्यांच्या माध्यमातून उद्ध्वस्त केली.