पाकिस्ताने आता शस्त्रे खाली ठेवावीत आणि…; जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्र्‍यांचा थेट इशारा

भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव वाढला असून पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यात अनेक नागरिकांचे घर, दुकाने उद्ध्वस्त झाली आहेत. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी घटनास्थळी जाऊन पीडितांना भेट दिली. त्यांनी पाकिस्तानच्या कृत्याचा निषेध केला असून शांततेचा आवाहन केला आहे. सुरक्षा दलांनी पाकिस्तानी आक्रमणाचा प्रतिकार केला आहे.

पाकिस्ताने आता शस्त्रे खाली ठेवावीत आणि...; जम्मू-कश्मीरच्या मुख्यमंत्र्‍यांचा थेट इशारा
CM omar Abdullah
| Updated on: May 09, 2025 | 4:56 PM

सध्या भारत-पाकिस्तानच्या सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळत आहे. जम्मू-कश्मीरच्या सीमावर्ती भागात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत रात्रभर जोरदार गोळीबार केला. या हल्ल्यात अनेक नागरिकांची घरे आणि दुकाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. पाकिस्तानी सैन्याने थेट सीमेवरील निष्पाप नागरिकांना लक्ष्य केल्याने परिसरात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सांबा या ठिकाणी आश्रय घेतलेल्या नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या.

आम्हाला प्रत्युत्तर देणे भाग

मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सांबामधील लोकांसाठी उभारण्यात आलेल्या मदत शिबिराला भेट दिली. यानंतर त्यांनी या गंभीर परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली. ‘पाकिस्तानने थेट निष्पाप नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. ही अत्यंत निंदनीय बाब आहे. त्यांनी ड्रोनचा वापर केला. पण आपल्या सुरक्षा दलाने सतर्क राहून त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. काश्मीरमधील अनंतनाग येथील दारूगोळा डेपोलाही लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. पण तोही निष्फळ ठरला. पहलगाममध्ये निष्पाप लोकांची हत्या झाल्यानंतर आम्हाला प्रत्युत्तर देणे भाग पडले,
असे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी म्हटले.

पुछंमध्ये सर्वाधिक जीवित आणि वित्तहानी

“पुंछमधील गोळीबारात मोठे नुकसान झाले आहे. पुछंमध्ये सर्वाधिक जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या ठिकाणी जखमींची संख्याही जास्त आहे. मी स्वतः जम्मूच्या रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. ते सर्व पुंछमधील असल्याचे मला समजले. पुंछमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. उपमुख्यमंत्रीही लवकरच पुंछला भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधणार आहेत.” असेही उमर अब्दुल्ला यांनी सांगितले.

कोणताही फायदा होणार नाही

“आम्ही नागरिकांसाठी सर्वतोपरी मदत करत आहोत. शिबिरांमध्ये दिवसातून तीन वेळा जेवण, स्वच्छतेची व्यवस्था, डॉक्टरांची उपलब्धता आणि रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे. येथे आश्रय घेतलेल्या नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, याची आम्ही काळजी घेत आहोत. पाकिस्तान सातत्याने परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्याचा त्यांना कोणताही फायदा होणार नाही. त्यांनी आता शस्त्रे खाली ठेवावीत आणि तणाव कमी करण्याच्या दिशेने वाटचाल करावी”, असे उमर अब्दुल्ला यांनी म्हटले.

Follow Us