
दिल्ली ते श्रीनगर इंडिगो फ्लाईटला बुधवारी रात्री अचानक बदलेल्या हवामानाचा जोरदार फटका बसला होता. दिल्लीतील मेट्रो सेवा यांच्यासह विमानसेवाही बंद पडली होती. त्याचमुळे श्रीनगरसाठी उड्डाण घेणाऱ्या इंडिगो फ्लाईटला भयंकर टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. त्यामुळे खराब हवामानाने २२० हून अधिक प्रवाशांनी भरलेले विमान क्षतिग्रस्त झाले. आता एका वेबसाईटच्या मते या संकटाच्या वेळी पाकिस्तानने आपले खरे रंग दाखवले आणि कठीण काळात मदतीस नकार दिला. त्यामुळे भारतीय वायूसेनेने इंडिगो फ्लाईटला सुरक्षित स्थळी उतरवण्याची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली.
दिल्लीहून इंडिगोच्या फ्लाईटने उड्डाण घेतले त्यानंतर या विमानाला भयंकर टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला.त्यावेळी लाहोर एअर ट्रॅफीक कंट्रोलच्या अधिकाऱ्याशी बोलणी करण्याचा इंडिगोच्या वैमानिकांनी प्रयत्न केला. त्यांना या इमर्जन्सीची कल्पना देण्यात आली आणि २२० प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी पाकची हवाई हद्द काही वेळ वापरण्याची परवानगी मागण्यात आली होती. या संदर्भात इंडिया टुडेच्या बातमीनुसार मात्र, पाकिस्तानने त्यास विरोध केला. त्यानंतर अखेर भारतीय वायू सेनेने आपल्या खांद्यावर ही जबाबदारी घेत विमानाचे सुखरुप लँडींग श्रीनगरात होईल याची काळजी घेतली.
एअरफोर्सने इंडिगोच्या या फ्लाईटने रिअल टाईम असिस्टंन्स देण्याचे काम केले. पायलटला सातत्याने इनपुट दिले गेले आणि श्रीनगरात विमानाची सुखरुपणे इमर्जन्सी लँडींग झाल्याचे म्हटले जात आहे.भारत आणि पाकचे संबंध बिघडल्याने पाकिस्तान सिव्हील एव्हीएशन अथोरिटीने NOTAM इश्यु केलेला आहे. त्यामुळे भारतीय विमानांना पाकच्या हवाई हद्दीत एन्ट्री मिळत नाही. परंतू भारतीय वायूसेनेने मदत केल्याने हे शक्य झाल्याचे वृत्त आहे.
२१ मेच्या रात्री इंडिगो कंपनी एक निवेदन जारी केले होते. त्यात इंडिगोने म्हटले होते की, दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाईट क्रमांक 6E 2142 ला अचानक वादळी गारांच्या पावसाचा सामना करावा लागला होता. विमान आणि केबिन क्रूने प्रोटोकॉलचे पालन केले आणि विमान श्रीनगर येथे सुरक्षितपणे उतरले असे या निवेदनात म्हटले होते. या विमानाचे नाक टर्ब्युलन्समध्ये अडकल्याने तुटल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हजारो फूट उंचीवर प्रवाशांचे प्राण अगदी कंठाशी आले होते.