Isha Mahashivratri 2026 : राष्ट्रनिर्मितीची खरी सुरुवात अंतर्गत परिवर्तनातूनच… राष्ट्रनिर्मितीत असमान्य योगदान देणाऱ्यांचा राजनाथ सिंह यांच्या हस्ते गौरव

ईशा योग केंद्रातील महाशिवरात्री उत्सवात सद्गुरू व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘भव्य भारत भूषण पुरस्कार’ सुरू करण्यात आला. राष्ट्रनिर्मितीत असामान्य योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे हा या पुरस्काराचा उद्देश आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींना सन्मानित करून सद्गुरूंनी ‘भव्य भारत’ घडवण्यासाठी नागरिकांना प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

Isha Mahashivratri 2026 : राष्ट्रनिर्मितीची खरी सुरुवात अंतर्गत परिवर्तनातूनच... राष्ट्रनिर्मितीत असमान्य योगदान देणाऱ्यांचा राजनाथ सिंह यांच्या हस्ते गौरव
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
| Updated on: Feb 16, 2026 | 12:28 PM

राष्ट्रनिर्मितीत असामान्य योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी ईशा योग केंद्रातील महाशिवरात्री उत्सवात सद्गुरू, ईशा फाउंडेशनचे संस्थापक आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते प्रथमच ‘भव्य भारत भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. “राष्ट्र म्हणजे फक्त भूभाग नसतो; राष्ट्र म्हणजे त्याची माणसं. माणसं प्रेरित आणि कटिबद्ध असतील तरच आपण भव्य भारत घडवू शकतो,” असे सांगत सद्गुरूंनी या उपक्रमामागील विचार स्पष्ट केला. ‘भव्य भारत भूषण पुरस्कार’ हा विविध क्षेत्रांमध्ये राष्ट्रनिर्मितीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. कॉर्पोरेट/व्यवसाय, कला व साहित्य, क्रीडा, समाजकल्याण, विज्ञान व तंत्रज्ञान आणि संस्कृती अशा महत्त्वाच्या क्षेत्रांत दरवर्षी सात पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्काराने गौरव

2026 सालच्या पुरस्कार प्राप्त नागरिकांमध्ये अनेकांचा समावेश होता. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात भारताच्या तांत्रिक प्रगतीला गती देणाऱ्या उल्लेखनीय कार्यासाठी श्री नांबी नारायण आणि श्री किरण कुमार यांना गौरवण्यात आलं. तसेच नृत्य क्षेत्रात भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरेचे जतन करणाऱ्या प्रख्यात नृत्यांगना सौ. अलार्मेल वल्ली यांना सन्मानित करण्यात आले. संगीत क्षेत्रात आपल्या अप्रतिम व्हायोलिन वादनाने भारतीय सांस्कृतिक विश्व समृद्ध करणाऱ्या दिग्गज कलाकार सौ. एन. राजम यांचाही राजनाथ सिंह यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

तर इतिहास व संस्कृती क्षेत्रात संशोधनाधिष्ठित लेखनातून भारताचा इतिहास उजागर करणारे श्री विक्रम संपत यांना सन्मानित करण्यात आले. क्रीडा क्षेत्रात आपल्या उल्लेखनीय कामगिरीने देशाचा जागतिक क्रीडाक्षेत्रात लौकिक वाढवणाऱ्या बॅडमिंटनपटू सौ. सायना नेहवाल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संरक्षण क्षेत्रात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या सन्मानार्थ भारतीय सशस्त्र दलांच्या प्रतिनिधींनाही गौरविण्यात आले. एअर मार्शल जितेंद्र मिश्रा (एओसी-इन-सी, वेस्टर्न एअर कमांड, भारतीय वायुसेना), लेफ्टनंट जनरल ए.व्ही.एस. राठी (जीओसी १२ कॉर्प्स, डेजर्ट कॉर्प्स, साउदर्न कमांड, भारतीय सेना) आणि व्हाइस अॅडमिरल आर.व्ही. गोखले (चीफ ऑफ स्टाफ, वेस्टर्न नेव्हल कमांड, भारतीय नौदल) यांना त्यांच्या शौर्यपूर्ण आणि अचूक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मानवतावादी सेवा आणि निर्णायक कारवाई यासाठी सशस्त्र दलांच्या दुहेरी भूमिकेचा हा विशेष सन्मान आहे.

हजारो भाविकांची उपस्थिती

ईशा योग केंद्रातील महाशिवरात्री उत्सवादरम्यानच्या या समारंभाला हजारो भाविक उपस्थित होते. एवढचं नव्हे तर जगभरातील लाखो लोकांनी त्याचे प्रक्षेपण पाहिले. राष्ट्रनिर्मितीची खरी सुरुवात अंतर्गत परिवर्तनातून होते, असे सांगत सद्गुरूंनी नागरिकांना या आदर्श व्यक्तींमधून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. तसेच भव्य भारत घडवण्याचा संदेश दिला.