धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती
Dharmendra Pradhan Resignation : नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे कॉकरोच जनता पार्टीने आवाज उठवला आहे. अभिजीत दिपके धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यावर आता नड्डा यांनी भाष्य केले आहे.

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे कॉकरोच जनता पार्टीने आवाज उठवला आहे. अशातच आज केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे राजकारण करू नये, असे विधान केले. तसेच नड्डा यांना धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरही प्रश्न विचारण्यात आला होता, यावरही नड्डा यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटले ते जाणून घेऊयात.
प्रधान यांचा राजीनामा घेणार?
आजच्या पत्रकार परिषदेत नड्डा यांनी वेगवेगळ्या मुद्द्यावर भाष्य केले. शेवटी त्यांना धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना त्यांना म्हटले की, राजीनामा असा होत नाही, पेपरफुटीवरुन संसदेत चर्चा करा. विरोधकांनी चर्चेसाठी कितीही वेळ मागितला तरी सरकार तयार आहे. तसेच सरकार सीजेपीसोबतही चर्चेसाठी तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचाच अर्थ सरकार सध्या प्रधान यांचा राजीनामा घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसत आहे.
राहुल गांधींवर निशाणा
जेपी नड्डा यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना म्हटले की, ‘राहुल गांधी निवडक मुद्देच का मांडतात? यूपीए आणि इंडिया आघाडीच्या सरकारांच्या काळातील घटनांचा उल्लेख त्यांनी का केला नाही? तुमचा उद्देश विद्यार्थ्यांचे हित नाही. शिक्षणाची गुणवत्ता वाढावी किंवा विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी तुम्ही प्रयत्न करत नाही. तुम्हाला केवळ राजकीय फायदा घ्यायचा आहे आणि या मुद्द्यावर राजकारण करायचे आहे.’
राहुल गांधींच्या आरोपांची चौकशी करू
नड्डा पुढे म्हणाले की, ‘काँग्रेसच्या सत्ताकाळात अधिक पेपरफुटीच्या घटना घडल्या. झारखंड आणि तेलंगणासारख्या राज्यांतही पेपरफुटी झाली, जिथे भाजपचे सरकार नाही. त्यामुळे या विषयाचे राजकारण करणे योग्य नाही. आज राहुल गांधी यांनी संसदेत 150 पेपरफुटी झाल्याचा दावा केला. त्यांच्या या आरोपांची चौकशी केली जाईल. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय कसा शोधता येईल, यावर चर्चा होणे गरजेचे आहे. मुले ही देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांची काळजी घेणे ही सरकार आणि विरोधक दोघांचीही जबाबदारी आहे.’