शिंपले गोळा करण्यासाठी गेले ते परतलेच नाहीत; 8 जणांचा नदीत बुडून मृत्यू, PM मोदीही हळहळले
Karnataka River Tragedy : भटकल परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. थट्टेहक्कलू नदीत बुडाल्याने एकाच कुटुंबातील आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आणखी दोघे बेपत्ता आहेत.

कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील धक्कादायक बातमी समोर आली आहे. भटकल परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. थट्टेहक्कलू नदीत बुडाल्याने एकाच कुटुंबातील आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आणखी दोघे बेपत्ता आहेत. नदीत शिंपले गोळा करण्यासाठी 14 जण गेले होते. यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर चार जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. बेपत्ता दोघांचा शोध अद्याप सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने 8 जण बुडाले
समोर आलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण भटकलमधील शिराली भागातील शारदाहोलच्या पदुशिराली गावातील रहिवासी होते. पाणी ओसरल्यानंतर नदीत आणि समुद्रात जाऊन शिंपले गोळा करण्याची स्थानिक मच्छीमारांची परंपरा आहे. त्यानुसार संपूर्ण कुटुंब थट्टेहक्कलू नदीत शिंपले गोळा करण्यासाठी गेले होते. मात्र नदीच्या पाण्याची खोली लक्षात न आल्याने ही मोठी दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
मृतांची नावे
या दुर्घटनेत लक्ष्मी मदेव नायक (38), लक्ष्मी शिवराम नायक (39), मालथी जट्टप्पा नायक (38), मस्तम्मा मंजुनाथ नायक (43), लक्ष्मी नायक, लक्ष्मी अन्नाप्पा नायक (44), ज्योती नायक (37) आणि उमेश मंजुनाथ नायक (42) यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व मृतक एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर नदी परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली असून बेपत्ता व्यक्ती सुखरूप सापडाव्यात यासाठी प्रार्थना केली जात आहे. स्थानिक पोलीस, किनारी सुरक्षा दल आणि मच्छीमारांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. एनडीआरएफच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.
प्रशासनाने काय म्हटले?
या दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया देताना उत्तर कन्नड जिल्हाधिकारी लक्ष्मी प्रिया यांनी सांगितले की, ‘प्राथमिक माहितीनुसार 14 जण नदीत गेले होते आणि त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक पोलीस शोधमोहीम राबवत आहेत. संध्याकाळपर्यंत पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर शोधकार्य अधिक वेगाने सुरू केले जाईल. उत्तर कन्नडचे पोलीस अधीक्षक दीपन यांनी सांगितले की, ‘शिंपले गोळा करण्यासाठी गेलेल्या 14 जणांपैकी 8 जणांचा मृत्यू झाला आहे. चार जणांना वाचवून मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे.’
ಕರ್ನಾಟಕದ ಕಾರವಾರ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸಂಭವಿಸಿದ ದುರಂತದ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿ ತೀವ್ರ ಆಘಾತವಾಯಿತು. ತಮ್ಮ ಪ್ರೀತಿಪಾತ್ರರನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡವರಿಗೆ ನನ್ನ ಸಂತಾಪಗಳು. ಗಾಯಗೊಂಡವರು ಶೀಘ್ರವಾಗಿ ಚೇತರಿಸಿಕೊಳ್ಳಲಿ ಎಂದು ಹಾರೈಸುತ್ತೇನೆ.
ಮೃತರ ವಾರಸುದಾರರಿಗೆ ಪಿ.ಎಂ.ಎನ್.ಆರ್.ಎಫ್ ವತಿಯಿಂದ ತಲಾ 2 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಹಾಗೂ ಗಾಯಗೊಂಡವರಿಗೆ 50,000 ರೂಪಾಯಿ…
— PMO India (@PMOIndia) May 24, 2026
पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेबाबत दुख: व्यक्त करताना म्हटले की, कर्नाटकात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेची बातमी ऐकून मला अत्यंत धक्का बसला आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी झालेल्यांनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी मी प्रार्थना करतो. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
