Kerala Thrissur Pooram Festival : पुन्हा सावरकरांच्या फोटोवरून वाद, केरळमध्ये नेमकं काय घडलं?
कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक असलेल्या परमेक्कावू मंदिर समितीने इतिहासातील प्रमुख व्यक्तींच्या फोटोंसह छत्र्या तयार केल्या होत्या. यामध्ये सावरकरांव्यतिरिक्त महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाष चंद्र बोस, सुब्रमण्यम भारती आणि मन्नथू पद्मनाभन यांच्या फोटोंरांचा समावेश होता.
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर (Savarkar) यांच्यावरून राजकीय वाद आणि आरोप प्रत्यारोप झाल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. आता केरळमध्ये सावरकरांच्या फोटोवरून पुन्हा वाद झाल्याचे दिसून आले आहे. हिंदुत्वाचे (Hindutva) प्रतीक मानल्या जाणाऱ्या विनायक दामोदर सावरकर यांच्या फोटोवरून केरळमध्ये वाद निर्माण झाला आहे. डाव्यांनी आणि काँग्रेस नेत्यांनी त्रिशूर पूरम उत्सवादरम्यान (Kerala Thrissur Pooram Festival) सावरकरांच्या फोटोला विरोध केला. मात्र हा विरोध होत असताना मंदिर समितीनेही हा फोटो काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. केरळचा सर्वात मोठा दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम 10 मेपासून सुरू होत आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांपैकी एक असलेल्या परमेक्कावू मंदिर समितीने इतिहासातील प्रमुख व्यक्तींच्या फोटोंसह छत्र्या तयार केल्या होत्या. यामध्ये सावरकरांव्यतिरिक्त महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुभाष चंद्र बोस, सुब्रमण्यम भारती आणि मन्नथू पद्मनाभन यांच्या फोटोंरांचा समावेश होता.
छत्र्या काढून टाकण्याचा निर्णय
मीडिया रिपोर्ट्सनुसार रविवारी छत्र्यांच्या प्रदर्शनादरम्यान अनेक डाव्या समर्थक संघटनांनी सावरकरांच्या फोटोला विरोध केला. मंदिर समितीचे अध्यक्ष सतीश मेनन यांनी सोमवारी सांगितले की, “आम्ही अशा छत्र्या काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आम्हाला कोणताही वाद नको आहे. DYFI त्रिशूर जिल्हा समितीचे अध्यक्ष आरएल श्रीलाल म्हणाले, ‘हा स्वातंत्र्य सैनिकांचा आणि त्यांच्या देशसेवेचा अपमान आहे.’पुरोगमना कला साहित्य संगम ही लेखक आणि कलाकारांची आणि डाव्यांची संघटना असून, या कार्यक्रमात सावरकरांच्या फोटोचा समावेश करण्याला विरोध केला आहे. लोकांना पूरम सणाच्या शुभ मुहूर्तावर सावरकरांचा फोटो पहायचा नाही, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे हा वाद आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
आधीही अनेकदा वाद
देशात अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांवरून वाद झाला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सावरकरांना अनेकदा विरोध दर्शवला आहे. तर भाजपने नेहमीच सावरकरांच्या समर्थनार्थ ठोस भूमिका घेतली आहे. मात्र सावरकरांवरून नेहमीच दोन गट पहायला मिळाले आहे. महाराष्ट्रातही अनेकदा सावरकरांवरुन राजकीय आरोप प्रत्यारोप झाले आहेत. काँग्रेसची सावरकरांच्याबाबतीत राहिलेली भूमिका आणि त्यावरून काँग्रेसवर झालेली टीका ही अनेकदा पाहायला मिळाली. आता पुन्हा या केरळमधील फोटोंवरून नवा वाद रंगला आहे. आता या वादात मंदिर समिती काय निर्णय घेते आणि यावर आता सावरकरप्रेमी संघटना काय भूमिका घेतात. त्यावर आता हा वाद काय स्वरुप धारण करणार? हे पाहावं लागणार आहे. एखाद्या महापुरुषाच्या फोटोवरून किंवा विचारसरणीवरून वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र असे वाद टाळणंही शांतता आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनं महत्वाचं आहे.