‘पाकिस्तानकडे पण अणुबॉम्ब, भारताने दाखवावा आदर’, हे काय बोलून गेले मणिशंकर अय्यर, भाजपने डागला काँग्रेसविरोधात दारुगोळा

Mani Shankar Aiyar on Pakistan : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भाजपपेक्षा त्यांचे नेतेच मोठ्या अडचणीत आणत असल्याचे चित्र आहे. सॅम पित्रोदा यांनी अडचणी वाढवल्यानंतर आता मणिशंकर अय्यर यांच्या एका जुन्या व्हिडिओचा बॉम्ब पडला आहे.

पाकिस्तानकडे पण अणुबॉम्ब, भारताने दाखवावा आदर, हे काय बोलून गेले मणिशंकर अय्यर, भाजपने डागला काँग्रेसविरोधात दारुगोळा
मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याने तापले वातावरण
| Updated on: May 10, 2024 | 11:21 AM

गांधी कुटुंबियांचे अत्यंत जवळचे सॅम पित्रोदा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. लोकसभा निवडणूक 2024 सुरु असताना काँग्रेसचे काही नेते भाजपचा मार्क सुकर करत असल्याचे दिसून येते. या नेत्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत भर पडत आहे. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘पाकिस्तानकडे पण अणुबॉम्ब, भारताने दाखवावा आदर’, या त्यांच्या वक्तव्याने लोकसभेच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापवले आहे. तर भाजपला काँग्रेसविरोधात अजून एक मुद्दा मिळाला आहे.

काय म्हणाले मणिशंकर

काँग्रेस नेते मणिशंकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. अय्यर म्हणाले की, “मोदी सरकार असे का म्हणते की तिथे दहशतवादी असल्याने आम्ही पाकिस्तानसोबत चर्चा करणार नाही. दहशतवादाला संपविण्यासाठी चर्चा अत्यंत गरजेची आहे. पाकिस्तान विचार करत असेल की भारत गर्विष्ठपणा दाखवत जगभरात आम्हाला हिणवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील कोणताही पागल त्यांच्याकडील अणुबॉम्बचा वापर करु शकतो.”

भाजपचा ताबडतोब हल्ला

मणिशंकर अय्यर यांच्या या व्हायरल व्हिडिओवर भाजपने ताबडतोब हल्लाबोल केला. काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम काही थांबण्याचे नावच घेत नाहीये. गांधी कुटुंबाच्या अगदीजवळचे अंकल मणी, हे पाकिस्तानात जाऊन मोदी सरकार हटविण्यासाठी मदत मागून आले आहेत. ते पाकिस्तानची ताकद काय आहे हे सांगत आहेत. मणिशंकर अय्यर म्हणत आहेत की भारताने, पाकिस्तानाचा आदर करावा. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, असा पलटवार भाजपच्या गोटातून शहजाद पुनावाला यांनी केला.

हे तर फारुक अब्दुल्ला यांचे बोल

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी पण अय्यर यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. राहुल गांधी, काँग्रेस, मणिशंकर अय्यर हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. काँग्रेसने आता तरी ही दुहेरी धोरण सोडून द्यायला हवे. ते सध्या फारुक अब्दुल्ला यांची भाषा बोलत आहेत, असा पलटवार गिरीराज सिंह यांनी केला.