२५० तंबू जळून खाक, सिलिंडरच्या स्फोटाने सारं काही अस्ताव्यस्त, महाकुंभातील अग्निकांडानंतरचे थरकाप उडविणारे दृश्य
महाकुंभ-२०२५ येथे उपस्थित असलेल्या सर्व टीमनी एकत्र काम केले आणि आग आटोक्यात आणण्यात आली. एनडीआरएफच्या चार तुकड्या येथे तैनात केल्या आहेत असे एनडीआरएफचे डीआयजी एम.के शर्मा यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील महाकुंभ मेळाव्यात अचानक लागलेल्या आगीत तब्बल अडीचशे तंबू जळून खाक झाले आहेत. या आगीत अनेक सिलिंडरचा स्फोट झाल्याने या ठिकाणचा नजरा थरकाप उडविणारा होता. सुदैवाने या आगीवर त्वरित नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. अन्यथा मोठे नुकसान झाले असते. या घटनेत कोणतीही प्राणाहानी झाली नसल्याचे एएनआयने म्हटले आहे. या सेक्टर -१९ मधील अखिल भारतीय धर्म संघ गीता प्रेस ( गोरखपुर ) यांच्या तंबुला लागली होती. परंतू ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही. मात्र, जेवण बनविण्यासाठी आणलेल्या स्वयंपाकाच्या सिलिंडरने ही आग लागल्याचे म्हटले जात आहे.
जगभरातील कोट्यवधी हिंदू भाविकाचे श्रद्धास्थान असलेल्या उत्तर प्रदेशातील महाकुंभात सेक्टर -१९ मध्ये रविवारी दुपारी लागलेल्या आगीने रौद्र रुप धारण करायच्या आधीच तिच्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. तरीही या आगीत २५० हून तंबू जळून खाक झाले आहेत. आगीचे नेमके कारण समजलेले नाही. सुरुवातीच्या माहितीनुसार एका सिलींडरला आधी आग लागली नंतर हा आगीने विक्राळ रुप धारण केले. या आगीत अनेक सिलिंडरीचे स्फोट झाल्याने दहशतीचे वातावरण पसरले. या आगीत आठ ते नऊ सिलींडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविले.
योगी आदित्यनाथ यांनी घेतली दखल
सेक्टर – १९ मधील गीता प्रेसच्या तंबुला सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीच्या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.त्यांच्या कार्यालयातील सर्व अधिकारी घटनास्थळी हजर होते.योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणात सर्व उपाय योजण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अशा घटना यापुढे घडू नयेत यासाठी सर्व उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत.




महाकुंभ २०२५ चे अधिकृत हँडलने एक्सवर एक पोस्ट केली आहे. ही खुप दुखद घटना आहे. महाकुंभ मधील आगीने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रशासनाने तात्काळ मदत आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे. आम्ही सर्व लोकांची सुरक्षेसाठी गंगा मातेची प्रार्थना करीत आहोत असे या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे.
आगीवर नियंत्रण मिळविले आहे. कोणतीही मनुष्यहानी झाल्याचे वृत्त नाही, सर्वजण सुरक्षित आहेत. आग लागण्याच्या कारणाचा शोध सुरु आहे. प्रथमदर्शनी सिलींडरमुळे आग लागल्याचे म्हटले जात आहे. अजून या संदर्भात तपास सुरु आहे. प्रत्यक्ष दर्शींना सिलिंडर स्फोटाचे आवाज आले होते. लोकांची सुखरुप सुटका केली आहे. आणि आगीला विझविले आहे. कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. दोन सिलींडरचा स्फोट झाल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे. परंतू तपास सुरु आहे असे उत्तर प्रदेशचे एडीजी भानू भास्कर यांनी म्हटले आहे.
२५० तंबू जळाले
महाकुंभमेळा परिसरात उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने दावा केला की आगीत सुमारे २५० तंबू जळून खाक झाले. आगीच्या ज्वाळा खूप जास्त होत्या. खूप मोठ्या परिसरात आग लागली होती. आगीत सुमारे २५० तंबू जळून खाक झाले.
महाकुंभ -२०२५ यंदा १३ जानेवारीपासून सुरु झाला आहे. आणि २६ फेब्रुवारीपर्यंत भरणार आहे. १८ जानेवारीपर्यंत महाकुंभात ७ कोटींहून अधिक भाविक आणि साधूसंतांनी त्रिवेणी संगमात स्नान केले आहे. रविवारी ४७ लाखांहून अधिक श्रद्धाळूंनी पवित्रस्नान सोहळ्यात सहभाग घेतला आहे.