अपवादात्मक घटना नाही तर…! केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पश्चिम बंगाल सरकारवर हल्लाबोल
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. दुसरीकडे, राज्यात एसआयआरवरून वादाला फोडणी मिळाली आहे. या प्रकरणात मालदामध्ये 7 न्यायिक अधिकाऱ्यांना 8 तास ओलिस ठेवलं होतं. त्यावरून आता भाजपाने पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली आहे.

पश्चिम बंगालमधील मालदा येथे न्यायिक अधिकाऱ्यांना ओलीस ठेवल्याच्या घटनेवर रणकंदन माजलं आहे. या घटनेनंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी पश्चिम बंगाल सरकारवर भाजपाने हल्लाबोल केला आहे. इतकंच काय तर सर्वोच्च न्यायालयाने कडक भूमिका घेतली असून न्यायिक प्रक्रियेतील गंभीर अडथळा असल्याचं सांगत कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असं सांगितलं. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 2 एप्रिल 2026 रोजी पश्चिम बंगालमधील मालदा येथे घडलेल्या घटनेला “प्रशासकीय अपयश” असल्याचे म्हंटलं आहे. त्यांनी ट्वीट करून पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार टीका केली आहे.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा ट्वीट करत हल्लाबोल
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, ‘मालदा ही एक अपवादात्मक घटना नाही ते व्यवस्थेच्या पतनाचे एक लक्षण आहे. सात न्यायिक अधिकाऱ्यांना नऊ तासांहून अधिक काळ ओलीस ठेवण्यात आले, त्यांना अन्न आणि पाणीही नाकारण्यात आले. हे शासकीय सत्तेच्या संपूर्ण विघटनाचे द्योतक आहे. यात मालदा-मुर्शिदाबादमधील हिंसाचाराची भर पडते. हिंदू कुटुंबांचे विस्थापन आणि हरगोबिंदो व चंदन दास यांची निर्घृण हत्या, हे सर्व शासन-नियंत्रित प्रशासकीय यंत्रणेच्या अंतर्गत घडले आहे. जबाबदारी थेट आणि अटळ आहे. सर्वोच्च न्यायालयासमोरही, हे प्रकरण ‘राजकीय नाही’ असे म्हणून कमी लेखले गेले, पण काही तासांनंतर त्यात राजकारण घुसवण्यात आले. हा विरोधाभास स्पष्ट आहे. पश्चिम बंगाल हे सर्व पाहत आहे आणि टीएमसीच्या गुंडांकडून चालवल्या जाणाऱ्या भीती पसरवण्याच्या राजकारणाचा शेवट जवळ येत आहे.’
Malda is not an aberration—it is a symptom of systemic collapse under @MamataOfficial and @AITCOfficial.
Seven judicial officers held hostage for over nine hours, denied even food and water—this reflects a complete breakdown of state authority. Add to this the violence in…
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) April 2, 2026
काय म्हणाल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी?
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी विधान करत हात वर केले आहेत. ममता बॅनर्जी म्हणाला की, मालदा घटना कोणी घडवली हे मला माहीत नाही. मुख्य सचिवांनी अद्याप माझ्याशी संवाद साधलेला नाही. मला कोणतीही माहिती दिली जात नाही.
काय आहे प्रकरण?
एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील अनेक ठिकाणी मतदार याद्यांमधून नावे वगळली गेल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं आहे. विरोधक या मुद्द्यावरून वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं करत आहे.