Mamata Banerjee : ‘महाराष्ट्र मुकाबला करु शकला नाही, पण इथं बंगालची वाघीण बसलीय’, ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा

| Updated on: Jul 25, 2022 | 8:00 PM

'महाराष्ट्र मुकाबला करु शकला नाही. बंगाल सरकारही पाडण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, बंगालमध्ये बंगालची वाघीण आहे. तुम्हाला तिच्याशी लढाई करावी लागेल. ती कुणालाही घाबरत नाही'.

Mamata Banerjee : महाराष्ट्र मुकाबला करु शकला नाही, पण इथं बंगालची वाघीण बसलीय, ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा
ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल
Image Credit source: Twitter
Follow us on

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. महाराष्ट्र (Maharashtra) मुकाबला करु शकला नाही. बंगाल सरकारही पाडण्याच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, बंगालमध्ये बंगालची वाघीण आहे. तुम्हाला तिच्याशी लढाई करावी लागेल. ती कुणालाही घाबरत नाही. ती आज काही बोलली नाही म्हणजे ती घाबरली असं लोक समजतात. मात्र ती घाबरलेली नाही, असा इशाराच ममता बॅनर्जी यांनी भाजप नेतृत्वाला दिलाय. बॅनर्जी यांनी सोमवारी शिक्षक भरती घोटाळ्याबाबत (Teacher recruitment scam) मौन सोडलं आणि आपण अन्याय सहन करणार नाही, असं त्या म्हणाल्या.

‘पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला तर खपवून घेणार नाही’

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, योग्य वेळी सत्याचा विचार व्हावा अशी माझी इच्छा आहे. दोषी ठरल्यास जन्मठेपेची शिक्षा व्हायलाही हरकत नाही. पण ज्या प्रकारे पैसे शोधण्यासाठी महिलेच्या घरावर चिखलफेक सुरु आहे. मी राजकारण केलं नसतं तर जीभ छाटली असती. एजन्सीचा दुरुपयोग करा, पण पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला तर खपवून घेणार नाही. त्या महिलेशी पक्षाचा आणि सरकारचा काही संबंध नाही. बलात्काराचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालतो. त्यामुळे या प्रकरणाचाही तीन महिन्यात विचार व्हावा, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केलीय.

‘लक्षात घ्या की जखमी वाघीण अधिक भयंकर बनते’

या प्रकारे आपला अपमान होणार असेल तर लक्षात घ्या की जखमी वाघीण अधिक भयंकर बनते. 2021 च्या निवडणुकीत पाय तोडले होते. जर मान खाली घालायची असेल तर सर्वसामान्य जनतेसमोर झुकू. जर कुणी मीडिया ट्रायल करेल, तर कृपया आगीशी खेळू नका. माझ्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करु नका. तर तुम्ही मला स्पर्श कराल तर मला माहिती आहे की बोल्ड आऊट कसं करायचं, अशा शब्दात बॅनर्जी यांनी भाजपला इशारा दिलाय.