तृणमूल पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठी वेगवान घडामोडी, ममता बॅनर्जींना मिळणार थेट मल्लिकार्जुन खर्गे यांचं पद?

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा पराभव झाला होता, त्यानंतर तृणमूलला गळती लागल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता तृणमूलचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चेला देखील उधाण आलं आहे.

तृणमूल पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासाठी वेगवान घडामोडी, ममता बॅनर्जींना मिळणार थेट मल्लिकार्जुन खर्गे यांचं पद?
Mamata Banerjee
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 10, 2026 | 5:19 PM

काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसला. तृणमूल काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला. राज्यात भाजपची सत्ता आली. त्यानंतर आता तृणमूल काँग्रेसला एका पाठोपाठ एक धक्के बसत असल्याचं दिसून येत आहे. 58 पेक्षा अधिक आमदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सडोली आहे. त्यांनी वेगळा गट स्थापना केला, आणि या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मान्यता देखील देण्यात आली. दरम्यान त्यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार 20 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना तृणमूल पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव दिला होता.

समोर आलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी या हा प्रस्ताव स्विकारण्यास तयार आहेत. परंतु त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनी त्यासाठी एक अट ठेवली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार या सर्व पार्श्वभूमीवर अभिषेक बॅनर्जी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अभिषेक बॅनर्जी यांनी राहुल गांधींकडे मल्लिकार्जुन खरगे यांचं पद मागितलं आहे.

नेमकी काय आहे मागणी?

काँग्रेसने ममता बॅनर्जी यांना राज्यसभेवर पाठवावं आणि त्यांना राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद द्यावं अशी मागणी अभिषेक बॅनर्जी यांनी काँग्रेसकडे केली आहे. सध्या मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. ममता बॅनर्जी यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याची तयारी दर्शवली आहे, मात्र त्यासाठी त्यांनी आता ही अट घातल्यामुळे काँग्रेस ही अट मान्य करणार का? आणि तृणमूलचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पराभवानंतर ममता बॅनर्जी या दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये देखील सहभागी झाल्या होत्या. आता तृणमूलची पुढची दिशा काय असरणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

Follow Us