PM मोदींच्या टीममध्ये फेरबदल, या 12 खात्यांचे मंत्री बदलणार? मोठी अपडेट काय?
Modi Cabinet Reshuffle : सध्याच्या राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. जवळपास 12 खात्यांचे मंत्री बदलले जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. तसचे सध्याच्या राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी खात्यांचे बदलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमक्या कोणत्या मंत्रालयांमध्ये मोठे बदल होतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीत, मात्र जवळपास डझनभर मंत्र्यांमध्ये फेरबदल होऊ शकतात. 18 जून रोजी राज्यसभा निवडणुका होणार आहेत. त्यानंतर मंत्रिमंडळात हे बदल केले जाण्याची शक्यता आहे.
न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आगामी काळात पंजाब आणि उत्तर प्रदेशसह काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. याची तयारी म्हणून भाजप मंत्रिमंडळाबाबत महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, किमान दोन कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्री मंत्रिमंडळातून बाहेर जाऊ शकतात. तसेच एका वरिष्ठ मंत्र्याला दक्षिण भारतातील एका राज्यात पक्षाची धुरा सोपवली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. आता याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
मित्रपक्षांनाही संधी मिळू शकते संधी
मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात एनडीएतील घटकपक्ष जेडीयू, टीडीपी, एनसीपी आणि आरएलएमसारख्या मित्रपक्षांना अधिक प्रतिनिधित्व मिळू शकते. या फेरबदलात नीतीश कुमार यांच्या जेडीयू आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीला याचा सर्वाधिक फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, मित्रपक्षांच्या नेत्यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपणार
राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या काही मंत्र्यांना यावर्षी किंवा 2027 च्या सुरुवातीला संघटनात्मक कामासाठी पाठवले जाऊ शकते. तसेच 70 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या काही राज्यसभा सदस्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार सुरू असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
या मंत्रालयांचे मंत्री बदलण्याची शक्यता
समोर आलेल्या माहितीनुसार, रेल्वे, अर्थ, कॉर्पोरेट व्यवहार, कोळसा, वस्त्रोद्योग, माहिती व प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, रसायन व खते, सहकार, मत्स्यव्यवसाय, जलशक्ती, कृषी, पर्यावरण, कायदा तसेच इतर काही मंत्रालयांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.